अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दिलासा! पॉलिटेक्निक प्रवेश अर्जासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करणे, ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करणे आणि तांत्रिक अडचणींमुळे अर्ज पूर्ण करता आला नव्हता. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दिलासा! पॉलिटेक्निक प्रवेश अर्जासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या (Polytechnic Course) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी (Admission process) अर्ज भरण्याची मुदत ६ जुलैपर्यंत वाढवण्यात (Extension of time for filling application form) आली आहे. यामुळे अभियांत्रिकी पदविकेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विद्यार्थ्यांच्या मागणी आणि प्रवेश प्रक्रियेला मिळालेल्या प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची अतिरिक्त संधी मिळाली आहे.

यापूर्वी निश्चित केलेली मुदत संपल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. अंतिम मुदतीपर्यंत १ लाख ६१ हजार ७८६ उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती, त्यापैकी १ लाख ३२ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी शुल्क भरण्यासह अर्ज निश्चित केले होते. मात्र ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करणे, ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करणे आणि तांत्रिक अडचणींमुळे अर्ज पूर्ण करता आला नव्हता. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही अखेरची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि ६ जुलैपर्यंत अर्ज निश्चित करावा, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक माहिती देण्यात आली आहे. प्रवेश नियमावली, कॅप फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज पूर्ण करावेत, जेणेकरून पुढील प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल.

या मुदतवाढीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने उच्च शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत वेबसाइटवरूनच माहिती घ्यावी आणि वेळेचा सदुपयोग करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.