मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार! पूर्ण पेपर लिहून 'शून्य' गुण; फेरतपासणीत २९ पैकी २८ विद्यार्थी पास

अंतिम सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध विषयांत शून्य गुण मिळाल्याचे आढळले. हे विद्यार्थी आधीच्या पाच सत्रांत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले होते. उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रती मागितल्यानंतर धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार! पूर्ण पेपर लिहून 'शून्य' गुण; फेरतपासणीत २९ पैकी २८ विद्यार्थी पास

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परीक्षा आणि मूल्यमापन प्रक्रियेत पुन्हा एकदा गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या (Law Course) अंतिम सत्राच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी पूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही निकालात त्यांना शून्य गुण (0 marks despite writing the entire answer sheet) देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. पुनर्तपासणीनंतर २९ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण (28 out of 29 students passed) झाल्याने विद्यापीठाच्या मूल्यमापन यंत्रणेवर तीव्र टीका होत आहे.

अंतिम सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध विषयांत शून्य गुण मिळाल्याचे आढळले. हे विद्यार्थी आधीच्या पाच सत्रांत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले होते. उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रती मागितल्यानंतर धक्कादायक गोष्टी समोर आल्या. काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्याच नव्हत्या, तर काहींमध्ये फक्त दोन-तीन प्रश्नांची उत्तरे तपासून बाकीचे भाग पूर्णपणे दुर्लक्षित ठेवण्यात आले होते. एका विद्यार्थ्याला केवळ तीन प्रश्न तपासून अवघे नऊ गुण देण्यात आल्याचेही उघड झाले.

या चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावर विपरीत परिणाम झाला. एलएलएमसाठी सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळवूनही पदवी निकाल अपयशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अडकली. विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला.

अखेर विद्यार्थ्यांनी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांच्याकडे मदत मागितली. सावंत यांनी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेऊन तातडीने फेरतपासणी करण्याची मागणी केली. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केवळ ४८ तासांत पुनर्तपासणी पूर्ण केली. या प्रक्रियेत २९ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले.


________________________________________

हा प्रकार मुंबई विद्यापीठाच्या मूल्यमापन यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान होऊ नये, यासाठी मूल्यमापन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानआधारित करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनाने यापुढे अशा चुकांना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

- प्रदीप सावंत, युवासेना सिनेट सदस्य