NEET'चा गोंधळ राज संतापले, उत्तर भारतीय धार्जिनी शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नीट परीक्षेवरून देशभरात गोंधळ सुरू आहे. पेपर फुटीनं ग्रासलेल्या नीटला परीक्षा रद्द करावी लागलीय. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप झालाय. त्यानंतर सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल चढवला जातोय. विरोधकांकडून सरकारवर कडाडून टीका केली जातेय, परीक्षा पोरांची होती. पण सरकार फेल ठरलंय, असा आरोप विरोधक करत आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नीट परीक्षेवरून (NEET Exam) देशभरात गोंधळ सुरू आहे. पेपर फुटीनं ग्रासलेल्या नीटला परीक्षा रद्द (NEETLA exam canceled) करावी लागलीय. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप झालाय. त्यानंतर सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल चढवला जातोय. विरोधकांकडून सरकारवर कडाडून टीका केली जातेय, परीक्षा पोरांची होती. पण सरकार फेल ठरलंय, असा आरोप विरोधक करत आहेत, या सगळ्यात आता राज ठाकरेंनीही सरकारवर जोरदार ठाकरे तोफ सोडली आहे. त्यांनी केलेली मागणी सरकारला विचार करायला लावणारी आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या एक्स या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट (Social media posts) करत थेट पंतप्रधान यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच उत्तर भारतीय धार्जिनी असलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
राज ठाकरे नीटबद्दलच्या आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत, केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे. 'NEET' पेपरफुटीने परत एकदा हे सिद्ध झालं. 'NEET' चा पेपर १० लाख रुपयांना विकत घेतला गेला. आणि याची मुळं सापडली महाराष्ट्रात. अर्थात हे पेपरफुटीचं जाळं देशव्यापी आहे. यांत 'NEET' साठी तयार करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसचा पण हात आहे. हे सगळं झाल्यावर केंद्र सरकारने काय केलं तर परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशी लावली. या आधी पण २०२४ ला सीबीआय चौकशी अशाच एका प्रकरणात लावली होती त्यातून काही साध्य झालं नाही. या सगळ्यात आपण आपलं काम केलं असा सरकारचा आविर्भाव आहे. पण २२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय ?
मुळात २०१६ ला 'NEET' लादण्याची गरजच नव्हती. पण सगळं एकछत्री अंमलाखाली आणण्याची या सरकारची खुमखुमी इतकी तीव्र आहे की मग काही लाख लोकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला तर काय फरक पडतो ? 'NEET' बद्दल मी २०१६ पासून आक्षेप नोंदवत होतो. या परीक्षांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, ते महागडे कोचिंग क्लासेस लावणार. पुढे हे क्लासवाले आर्थिक शक्तीच्या जोरावर परीक्षांचे निकाल हवे तसे वाकवणार हे मला दिसत होतं आणि सामान्य घरातील मुलं, मुली भरडली जाणार हे मला दिसत होतं आणि म्हणून २०१६ पासून आम्ही याला विरोध करतोय.
माझ्या सारखाच विरोध दक्षिणेतील नेत्यांनी पण केला. सध्याचे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय पण 'NEET' रद्द करा म्हणून आग्रह धरत आहेत. कारण दक्षिणेतील ५ राज्य आणि महाराष्ट्र मिळून जवळपास ३५० च्या वर मेडिकल कॉलेजेस आहेत आणि वरती उत्तरेतली मोठ्या राज्यांमध्ये फक्त १८० मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामुळे उत्तरेतील विद्यार्थी दक्षिणेत घुसवण्यासाठी हा सगळा अट्टाहास २०१६ पासून सुरु आहे. आणि त्यासाठी कोचिंग क्लासेसचं सगळ्यात मोठं जाळं उत्तरेतल्या राज्यांत आहे. आणि व्यवस्था कशी वाकवायची हे त्यांना नीट माहित आहे. प्रश्न इतकाच आहे की अशा सडलेल्या व्यवस्थेतून जे डॉक्टर्स बाहेर पडतील त्यांच्या हातात आपण आपलं आरोग्य देणार आहोत का ? आणि का तर केंद्राला वाटलं की यापुढे मेडिकल प्रवेशासाठी एकच परीक्षा हवी म्हणून ?
आधी प्रत्येक राज्याची एक परीक्षा होती, त्याच्या आधी तर बारावीच्या मार्कांवर प्रवेश मिळायचा. समजा त्यात काही त्रुटी होत्या असं मान्य करू, मग त्या सुधारायच्या सोडून जी 'NEET' परीक्षा आणली ती अजून भीषण निघाली. या परीक्षेत कधी काही विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाल्याची उदाहरणं आहेत जे अशक्य वाटतं, कधी परस्पर ग्रेस मार्क्स दिलेत. थोडक्यात काय ज्याच्याकडे व्यवस्था वाकवायची शक्ती आहे त्याला पायघड्या घातल्या जाणार. सध्याचं सरकारचं बरं आहे की आमच्यासोबत आलात की तुम्ही स्वच्छ आणि आमच्या व्यवस्थेला एकदा शांत केलंत की मग तुम्ही काहीही करा.
प्रश्न असा आहे की मुळात मेडिकलच्या जागा कमी. त्यासाठी राष्ट्रव्यापी परीक्षा. तिचं काय होईल माहित नाही. दरवर्षी काहीतरी नवीन खेळ. काही वर्षांपूर्वी 'NEET' परीक्षेच्या गोंधळावर मी थेट पंतप्रधानांशी बोललो होतो, तेंव्हा प्रश्न सुटला. पण कायमस्वरूपी काही सुधारणा नाही. बरं इतकी वर्ष एकच माणूस धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून चिकटून बसलेत. त्यांच्या काळात 'NEET' मध्ये इतके घोळ झाले, पण तरीही हे महाशय तिथेच बसलेत. बहुदा हिंदी देशभर लादण्याचा अजेंडा ते नेटाने राबवत आहेत म्हणून त्यांना ही बक्षिसी दिली आहे का ? माझी पंतप्रधानांना विनंती आहे की २२ लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अनेकदा खेळ करणाऱ्या तुमच्या या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या.
माझी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना पण विनंती आहे की जरा पाठीचा कणा ताठ दाखवून दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा. हे 'NEET' वैगरे काही नको आपल्याला. आपल्याला आपल्या राज्यातील मुलांशी घेणंदेणं आहे. महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मराठी मुलांनाच प्रवेश मिळणार नसेल तर उपयोग काय तुमचा? सध्या पेट्रोल डिझेल वाचवतोय हे दाखवण्याचा जो संपूर्ण सरकारचा इव्हेन्ट सुरु आहे त्यातून बाहेर या. तुम्ही जे हे सगळं करत आहात हे एक दिवसाचं आणि एका फोटोपुरतं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्यापेक्षा मेडिकल प्रवेश परीक्षेबद्दल बोला आणि काहीतरी ठाम. ठाम म्हणजे राज्याच्या हिताची, नाही तर केंद्र जे सांगेल त्याला रेटून हो म्हणणं याला ठाम भूमिका म्हणतील. भूमिका घ्या. असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा सरकारचे वाभाडे काढलेत.
परीक्षा रद्द करायला सरकारच्या बापाचं काय जातंय, दोन दोन वेळा परीक्षा घेण्याचा कोट्यवधी रुपयांचा खर्च हा तर तुमच्या आमच्या टॅक्समधून जातोय. मग हे आहेतच बचतीचे फुकट सल्ले द्यायला. विद्यार्थ्यांच्या करिअर आणि जीवाशी खेळ करायला. पण यात होरपळतोय तो विद्यार्थी. यात होरपळतायत या विद्यार्थ्यांचे पालक. या रोजच्या पेपरफुटीचा आता वीट आलया. त्यामुळे याला नीट पर्मनंट सोलूशन हवंय, अशी तिखट पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे राज यांच्या या मागणीला सरकार किती गांर्भीयाने घेतंय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.