CET Cell : LLB 3 वर्षे परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान; आमदार राहूल कुल आक्रमक
परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या एलएलबी ३ वर्षे प्रवेश परीक्षेत सामान्य ज्ञान विभागात "शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते" असा प्रश्न विचारण्यात आला होता. याच प्रश्नावर शिवप्रेमींनी प्रश्न उपस्थित करत सीईटी सेलला धारेवर धरले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे (CET Cell) घेण्यात आलेल्या एलएलबी ३ वर्षे (LLB-3 Year) परीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख (Shivray Single Mention) करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर शिवप्रेमी आक्रमक झाले असून दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल कुल (Adv. Rahul Kul) यांनी संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या एलएलबी ३ वर्षे प्रवेश परीक्षेत सामान्य ज्ञान विभागात "शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते" असा प्रश्न विचारण्यात आला होता. याच प्रश्नावर शिवप्रेमींनी प्रश्न उपस्थित करत सीईटी सेलला धारेवर धरले आहे. ज्या थोर राजांच्या आदर्शावर आजचे प्रशासन चालते आणि ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपली, अशा थोर महापुरुषाचा उल्लेख शैक्षणिक परीक्षेत इतक्या बेजबाबदारपणे आणि एकेरी भाषेत होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. या प्रकारामुळे तमाम शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून परीक्षार्थीनी यासंदर्भात आमदार कुल यांच्याकडे निवेदन देऊन दाद मागितली आहे.

सदर प्रश्नपत्रिका संकलित करणारी समिती आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. सीईटी सेलने या गंभीर चुकीबद्दल तातडीने सार्वजनिकरीत्या माफीनामा प्रसिद्ध करावा. भविष्यात कोणत्याही शासकीय किंवा शैक्षणिक परीक्षेत महापुरुषांचा अवमान होणार नाही, याची स्पष्ट नियमावली तयार करावी यापुढे सर्व शैक्षणिक साहित्यात आणि प्रश्नपत्रिकेत 'छत्रपती शिवाजी महाराज' असाच पूर्ण आणि आदरयुक्त उल्लेख करणे अनिवार्य करण्यात यावे, अशा मागण्या आमदार कुल यांनी केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अवमान कोणत्याही स्तरावर सहन केला जाणार नाही. शैक्षणिक संस्थांनी आणि परीक्षा मंडळांनी अत्यंत जबाबदारीने काम करणे अपेक्षित असताना असा निष्काळजीपणा होणे चुकीचे आहे याबाबत राज्य सरकारने तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी भूमिका आमदार राहुल कुल यांनी यावेळी मांडली आहे.