महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा: चौथी-सातवीचा अंतिम निकाल जाहीर; ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

इयत्ता चौथीसाठी ६ लाख ९४ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ६ लाख ५७ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ७६ हजार ५८६ विद्यार्थी पात्र झाले आणि १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. चौथीचा निकाल २६.८७ टक्के लागला.

महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा: चौथी-सातवीचा अंतिम निकाल जाहीर; ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council) घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती (4th and 7th Class Scholarships) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर (Final results declared) करण्यात आला. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे (Dr. Nandkumar Bedse) यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एकूण निकाल २७.०९ टक्के लागला असून चौथी आणि सातवीच्या मिळून ३३ हजार २८१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (33,281 students eligible for scholarships) मिळाली आहे. परीक्षा २६ एप्रिल रोजी राज्यभरातील केंद्रांवर झाली होती. २५ जुलै रोजी अंतरिम निकाल जाहीर करून गुणपडताळणी अर्ज मागवण्यात आले होते. आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल तयार करण्यात आला.

एकूण ११ लाख ५६ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १० लाख ९१ हजार २५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २ लाख ९५ हजार ५४६ विद्यार्थी पात्र ठरले, तर ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. इयत्ता चौथीसाठी ६ लाख ९४ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ६ लाख ५७ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ७६ हजार ५८६ विद्यार्थी पात्र झाले आणि १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. चौथीचा निकाल २६.८७ टक्के लागला.

इयत्ता सातवीसाठी ४ लाख ६२ हजार १४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ४ लाख ३३ हजार ८७० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. १ लाख १८ हजार ९६० विद्यार्थी पात्र ठरले, तर १६ हजार ५८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. सातवीचा निकाल २७.४२ टक्के लागला. अंतिम निकालात शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचाच्या अधीन राहून शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार जिल्हा किंवा तालुक्यात संच उपलब्ध नसल्यास उर्वरित संच इतर ठिकाणी हस्तांतरित करून गुणवत्ता यादी तयार करण्यात आली.

राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी आणि प्रमाणपत्र संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्राची डिजिटल प्रत शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहे. शाळांनी उत्तम प्रतिच्या कागदावर रंगीत प्रत काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी. डिजिटल प्रत मागणीनुसार उपलब्ध करावी, असे परिषदेने स्पष्ट केले.

गुणपत्रकाची डिजिटल प्रत उपलब्ध असल्याने छापील गुणपत्रक वितरित केले जाणार नाही. विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या लॉगिनद्वारे निकालाची पडताळणी करावी. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळांनी आवश्यक सहकार्य द्यावे. ही परीक्षा राज्यातील मेधावी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची आहे. निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. परीक्षा परिषदेने सर्व संबंधित माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.