SPPU मेस चालकांची इंधन तुटीच्या आडून नफेखोरी; विद्यार्थ्यांच्या ताटांतून भाजी केली गायब
रोज एका भाजीचा ‘कट’ करून विद्यार्थ्यांची आर्थिक व पोषणात्मक हानी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुणवत्ता घसरलेली असून, शुल्क मात्र पूर्ववत घेतले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्यी नाराजी वाढली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
इराण–अमेरिका–इस्राएल संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन तुटीचा आधार घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेस चालकांकडून विद्यार्थ्यांच्या ताटातील पदार्थ कमी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून मेस व्यवस्थापनातील अनियमिततेचा मोठा फटका बसत असून मेस चालकांकडून विद्यार्थ्यांच्या ताटातील पदार्थ कमी करण्यात येत असल्याची गंभीर तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यापीठाच्या नियमांनुसार पूर्ण थाळीमध्ये २ भाजी (एक सुकी, एक पातळ), ४ चपात्या, वरण-भात, लोणचे व सलाड देणे बंधनकारक आहे. तसेच अर्ध्या थाळीत २ चपात्या आणि उर्वरित पदार्थ दिले जातात. मात्र, सध्या केवळ १ भाजी, ४ चपात्या आणि एक वेळ मसाले भात तर दुसऱ्या वेळेस वरण-भात असा बदल करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे विद्यार्थी सांगत आहेत. तसेच बऱ्याच वेळा रात्री नऊ वाजताच सर्व भाज्या संपत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

इंधन तुटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरुवातीला गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुरवठा सुरळीत करून आठवडाभरात सेवा पूर्ववत करण्याचे परिपत्रकही काढण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.त्यात विद्यापीठाचे अधिकारी सहभागी आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्यापीठातील चारही मेस मालकांकडून परीक्षेच्या काळातही हीच परिस्थिती कायम ठेवण्यात आली आहे. रोज एका भाजीचा ‘कट’ करून विद्यार्थ्यांची आर्थिक व पोषणात्मक हानी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुणवत्ता घसरलेली असून, शुल्क मात्र पूर्ववत घेतले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्यी नाराजी वाढली आहे.
या संदर्भात भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती अस्तित्वात असली तरी तिची बैठक घेतली जात नसल्याची माहिती समोर आले आहे. या समितीत प्राध्यापक, सीनेट सदस्य, कर्मचारी आणि ९ विद्यार्थी सदस्यांचा समावेश असूनही विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
विद्यार्थी रोहित भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गॅस सिलेंडरच्या किमतीत सुमारे ९०० रुपयांची वाढ झाली असली तरी, दररोज सुमारे १००० विद्यार्थी एका मेसमध्ये जेवत असल्याने एका भाजीचा दर (१२ रुपये) कमी करून मेस मालकांना दररोज अंदाजे ११ ते १२ हजार रुपयांचा अतिरिक्त नफा मिळत आहे. त्यामुळे इंधन तुटीचा मुद्दा हा केवळ नफेखोरीसाठी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, कुलगुरू आणि कुलसचिवांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढत आहे. “ही परिस्थिती प्रशासनाच्या मूक समर्थनाशिवाय शक्य आहे का?” असा सवालही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
परीक्षेच्या काळात आंदोलन टाळण्यासाठी विद्यार्थी सध्या परिस्थिती सहन करत असले तरी, लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांना सकस आणि पुरेसे अन्न मिळणार का, की प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांचे शैक्षणिक आणि शारीरिक नुकसान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----------------------------------------------
विद्यापीठातील मेसा चालकांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यांना नियमानुसार दोन भाजा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यांना नियमानुसार अन्न पदार्थ देणे शक्य नसेल तर नवीन निविदा प्रक्रिया राबवावी लागेल, अशी कल्पना मेस चालकांना देण्यात आली आहे.
-डॉ. राजेंद्र घोडे, भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ