आसनगाव कृषी विद्यालयाच्या वसतिगृहात १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्या; मृत्यूचे कारण अस्पष्ट

रूपाली गावित मूळची जव्हार येथील रहिवासी होती. ती आसनगाव येथील कृषी विद्यालयात सेकंड इयर डिप्लोमाचे शिक्षण घेत होती आणि शिक्षणासाठी वसतिगृहात राहत होती.

आसनगाव कृषी विद्यालयाच्या वसतिगृहात १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्या; मृत्यूचे कारण अस्पष्ट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आसनगाव येथील कृषी विद्यालयाच्या वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव रूपाली गावित असून, या घटनेमुळे विद्यालय परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. वसतिगृहात ती मृत अवस्थेत आढळल्यानंतर विद्यालय प्रशासनाने त्वरित पोलिसांना माहिती दिली. वाणगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची कार्यवाही सुरू केली आहे.

रूपाली गावित मूळची जव्हार येथील रहिवासी होती. ती आसनगाव येथील कृषी विद्यालयात सेकंड इयर डिप्लोमाचे शिक्षण घेत होती आणि शिक्षणासाठी वसतिगृहात राहत होती. घर सोडून महाविद्यालयात आल्यानंतर तिच्या वागण्यात काहीसा बदल जाणवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून ती मानसिक तणावात असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास केला जात आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा अन्य दबाव होता का, महाविद्यालय अथवा वसतिगृहातील काही बाबींमुळे ती त्रस्त होती का, तसेच घटनेपूर्वी तिचा कोणाशी संपर्क झाला होता का, याबाबत चौकशी सुरू आहे. वाणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू असून, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, वसतिगृहातील कर्मचारी आणि कुटुंबीयांशी संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे.

तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या दुःखद घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही सुरू ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याची गरजही या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.