पतंग उवडण्याच्या वादातून ९वीच्या वर्गातील विद्यार्थ्याची हत्या; अल्पवयीन मारेकरी पोलिसांना शरण

भंडाऱ्यात पतंग उडवण्याच्या वादातून १५ वर्षीय शाळकरी मुलाची हत्या झाल्याने खळबळ. अल्पवयीन संशयित आरोपीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण.

पतंग उवडण्याच्या वादातून ९वीच्या वर्गातील विद्यार्थ्याची हत्या; अल्पवयीन मारेकरी पोलिसांना शरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भंडारा शहरातील मेंढा भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर पतंग उडवताना झालेल्या क्षुल्लक वादातून १५ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या. हंस गजानन येरकडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो भागीरथा भास्कर शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर घडल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. आरोपीही त्याच वयोगटातील आणि त्याच भागातील रहिवासी असून तो थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर हंस दप्तर घेऊन मेंढा भागात आला आणि पतंग उडवू लागला. तिथे त्याच्या आणि संशयित आरोपीच्या दरम्यान वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली आणि हंस गंभीर जखमी झाला. अति रक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी त्याची शाळेची बॅग आणि पतंग पडलेले आढळले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि चौकशी सुरू केली.

घटनेची बातमी कळताच मृताच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली. त्यांनी आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी संतप्त नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईक आक्रमक असल्याने ठाण्याच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा बल तैनात केले.

भंडारा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने नागरीकांना शांततेचे आवाहन केले आहे. अशा घटनांमुळे पालक आणि शाळा प्रशासनाने मुलांमध्ये सलोखा आणि संयम वाढविण्यासाठी जागरूकता वाढविणे आवश्यक मत शिक्षणतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.