शाळेतील मुले पाश्चिमात्य संस्कृतीमुळे हैराण; उन्हाळ्यात घालावा लागतो कोट
केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांना सुध्दा गणवेशाची सक्ती करू नये. तर भौगोलिक परिस्थिती व बदल्या वातावरणानुसार विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करण्याची मुभा द्यावी.
![शाळेतील मुले पाश्चिमात्य संस्कृतीमुळे हैराण; उन्हाळ्यात घालावा लागतो कोट](https://eduvarta.com/uploads/images/2024/04/image_750x_662a475a0d498.jpg)
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात उष्णतेची लाट असून काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे नागरिक त्रासले आहेत.या उकाड्यातून शाळेतील विद्यार्थ्यांची जराही सुटका झालेली नाही.कारण पारा चाळीपर्यंत पोहचत असताना विद्यार्थ्यांना आजही शाळेत गणवेश म्हणून कोट परिधान करून यावा लागत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना पाश्चात्य संस्कृतीचा (Western culture)फटका बसत आहे.मात्र, केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांना सुध्दा गणवेशाची सक्ती करू नये. तर भौगोलिक परिस्थिती व बदल्या वातावरणानुसार विद्यार्थ्यांना गणवेश (Uniforms for students)परिधान करण्याची मुभा द्यावी,अशा प्रतिक्रिया शिक्षक व पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शासनाने विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिली आहे.तर मुलांची झोप होत नाही म्हणून सकाळी नऊ वाजल्यानंतर शाळा भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरूवात होते.त्यामुळे शासनाच्या दोन्ही निर्णयांमध्ये एकप्रकारे विरोधाभास असल्याचे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.त्यात विद्यार्थ्यांना कोट व जाड कपडे परिधान करून शाळेत जावे लागत आहे.शाळांमध्ये पंखे असले तरी त्यामुळे विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळत नाही.त्यामुळे गणवेशाची सक्ती करू नये,अशी मागणी केली जात आहे.
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले म्हणाले, गणवेश आणि शैक्षणिक गुणवत्तेचा तसा संबंध नाही.तरीही शिक्षकांना आदर्श गणवेशाबाबत सूचना दिल्या आहेत.खरे तर त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार गणवेश असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात कोट घालण्यापासून सूट द्यायला हवी.शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य सुध्दा महत्वाचे आहे.
प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिन डिंबळे म्हणाले,पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण शाळेतही केले जाते आहे.शाळेचे गणवेश हे भौगोलिक परिस्थितीनुसार असले पाहिजे.उन्हाळ्यात गरमीने विद्यार्थी हैराण झाले आहेत.पण आजही कोट घालून शाळेत जाणारे विद्यार्थी दिसून येतात.यात बदल झाला पाहिजे.
--------------------------