SPPU:विद्यापीठाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या ; युवक काँग्रेसचे आंदोलन

विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांबाबत एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या वतीने विद्यापीठ परिसरात मंगळवारी तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

SPPU:विद्यापीठाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या ; युवक काँग्रेसचे आंदोलन
NSUI and Youth Congress members stage a protest at SPPU demanding postponement of engineering exams and reforms in the university examination system.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांबाबत एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या वतीने विद्यापीठ परिसरात मंगळवारी तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन लीव्हशिवाय परीक्षा घेऊ नयेत, revaluation प्रक्रियेमधील त्रुटी दूर कराव्यात, “लॅप्स” स्थितीतील निकाल तातडीने जाहीर करावेत तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना द्यावा, अशा प्रमुख मागण्या मांडल्या. आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने अभियांत्रिकी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेत अधिकृत परिपत्रक जारी केले.

दरम्यान, ‘डीटीएल’च्या १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न खासगी प्रकाशनातील पुस्तकातून जसेच्या तसे विचारण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

युवक काँग्रेसचे मीडिया विभाग अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले, “विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा चूकीचा कारभार सातत्याने समोर येत आहे. खासगी प्रकाशनातील प्रश्न प्रश्नपत्रिकेत आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी,” 

एनएसयूआयचे भूषण रानभरे यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, असे सांगितले. तर विद्यार्थी महेश कांबळे यांनी, “उच्च न्यायालयाने काही विद्यार्थ्यांना दिलासा दिला असताना सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळायला हवा,” असे मत व्यक्त केले.

यावेळी अक्षय जैन, भूषण रानभरे, महेश कांबळे, अविनाश सोळुंके, तेजस बनसोड आणि अदिती आघाव आदी उपस्थित होते.