नागपूर हादरलं! बी-टेकच्या ३ विद्यार्थ्यांनी केली सेल्समनची हत्या, २ शाळकरी मुले बेपत्ता, नागपूरात चाललंय काय?
प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात बी-टेकचे शिक्षण घेणाऱ्या या तरुण विद्यार्थ्यांनी केवळ लालचेपोटी एका रात्रीत गुन्हेगारीच्या जगात पाऊल टाकत माणुकीला काळीमा फासणारे कृत्य केले. केवळ काही क्षणांच्या मोहाने या उच्चशिक्षित तरुणांचे भविष्य आता अंधारात लोटले असून, पोलिसांनी तिघांना देखील अटक केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नागपूरातून शिक्षण (Nagpur Crime News) क्षेत्राशी निगडीत एकामागे एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. गिट्टीखदान येथे हनुमान जयंती शोभायात्रा पाहण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा अथर्व नानोरे याचा अपहरणानंतर (Atharva Nanore Kidnapping) शनिवारी मृतदेहच सापडला. या खुनाच्या घटनेचा अद्याप उलगडा झालेला नसताना प्रतापनगरातही दोन शाळकरी मुले (2 School children Missing) घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. तर दुसरीकडे बी-टेकच्या ३ विद्यार्थ्यांची (B-Tech 3 students) एक सेल्समनची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडला आहे.
अभ्यासावरून आईने रागावल्याचा रुसवा मनात धरून आदित्य अमित मेश्राम (१६) आणि त्याचा लहान भाऊ प्रथमेश अमित मेश्राम (१२) ही भावंडे शनिवारी सायंकाळी घरातून निघून गेली. आदित्य आणि प्रथमेश ही त्यांची दोन्ही मुले प्रतापनगर पोलीस हद्दीतील सोमलवार शाळेत शिकतात. ही भावंडे अभ्यासात लक्ष घालत नसल्याने आई विनिता या मुलांच्या काळजीपोटी अभ्यास करण्यास सांगत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलांची आई विनिता त्यांना अभ्यासाला बसा, असे सांगून दुपारी कामावर गेल्या. सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी बराच वेळ वाट पाहिली. शेजारी विचारले. सायंकाळी सायकलवर निघून गेल्याचे कळल्याने मुले खेळायला गेली असावीत म्हणून त्यांनी पुन्हा काही वेळ वाट पाहिली. रात्रीचे साडे आठ वाजले तरी मुले घरी आली न आल्याने त्यांनी थेट प्रतापनगर पोलीस ठाणे गाठले.
गिट्टीखदानमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतापनगर पोलिसांनी गांभीर्य ओळखत तातडीने तपास पथकाला सतर्क केले. पथकाने परिसर पिंजून काढत सीसीटीव्ही फुटेजही तपासणे सुरू केले आहे. ज्या ठिकाणावरून मुले सायकवरून जाताना दिसली त्या बाजूच्या सर्व दिशांना पोलीस मुलांचा शोध घेत आहेत.
बी-टेकच्या ३ विद्यार्थ्यांनी सेल्समनची केली हत्या
कार आणि २ मोबाईलच्या शुल्लक लालचेपोटी बी-टेक अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांनी एका ४४ वर्षीय सेल्समनची निर्घृण हत्या केल्याची घटना देखील नुकतीच घडली आहे. प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात बी-टेकचे शिक्षण घेणाऱ्या या तरुण विद्यार्थ्यांनी केवळ लालचेपोटी एका रात्रीत गुन्हेगारीच्या जगात पाऊल टाकत माणुकीला काळीमा फासणारे कृत्य केले. केवळ काही क्षणांच्या मोहाने या उच्चशिक्षित तरुणांचे भविष्य आता अंधारात लोटले असून, पोलिसांनी तिघांना देखील अटक केली आहे.