आरटीई प्रवेशावर पालकांचा तक्रारीचा पाढा; शिक्षण विभागाकडून शाळांवर कारवाई
छत्रपती संभाजी नगर येथील सिडको परिसरातील गुरुसहानी नगर येथील भाग्यश्री सरला गुरुसहानी मेमोरियल स्कूल या शाळेने दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
RTE Admission: आरटीई प्रवेशबाबत केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे प्रवेश नाकरणाऱ्या शाळेला स्थानिक प्राथमिक शिक्षणाधिकारी (Primary Education Officer)यांनी नोटीस बजावली आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळेविरोधात प्रशासकीय कार्यवाही सुरू केली जाईल, असे लेखी पत्राद्वारे कळविले आहे.तसेच नवी मुंबई (Navi Mumbai)येथील ११ पालकांनी एकत्रित स्वाक्ष-या करून आरटीईतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अॅ क्टिव्हीटीच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शाळा १२ हजार रुपये शुल्काची मागणी करत असल्याची लेखी तक्रार पालिका शिक्षण अधिकारी (Written complaint to Municipal Education Officer)यांच्याकडे देण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के आरक्षण जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले. त्यातील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी लॉटरी करण्यात आले. लॉटरीद्वारे प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेत जाऊन प्रवेश देणे अपेक्षित आहे. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी येत्या ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु,अनेक शाळा जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यात छत्रपती संभाजी नगर येथील सिडको परिसरातील गुरुसहानी नगर येथील भाग्यश्री सरला गुरुसहानी मेमोरियल स्कूल या शाळेने दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने शासन निर्णय 9 फेब्रुवारी 2024 रद्द केला असून खाजगी कायम विनअनुदानित आणि विनाअनुदानित स्वयमअर्थ सहाय्यित शाळांना आरटीई अंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक केले आहे.त्यामुळे 2024 -25 या शैक्षणिक वर्षात वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरक्षित जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील सर्व शाळांनी शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.मात्र, काही शाळा या आदेशाचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.ही गंभीर असून शासनाच्या नियमाच्या विरोधात आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या नक्ष दीपक कडवे आणि वेदिका विनोद काथार या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अन्यथा शाळे विरोधात कारवाई केली जाईल, असे पत्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी काढले आहे.
----------------------------------------
आरटीईतून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी विकासनिधी किंवा इतर निधीसाठी बंधन घालता येणार नाही. इतर विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे वागणूक दिली जाते तशीच वागणूक आरटीईच्या विद्यार्थ्यांना द्यावी.त्यांच्यात परकेपणाची भावना निर्माण होणार नाही, याबाबत शाळांनी काळजी घेणे गरजेचे आहे. प्रवेशाबाबत काही तक्रारी असतील तर संबंधित शिक्षण अधिकारी यांच्याकडे पालकांनी तक्रार द्यावी. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काय करावे, याबाबत यापूर्वीच शिक्षण अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.
- शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे