बदलापूर पेटले : 3 वर्षांच्या शाळेतील मुलींवर अत्याचार, वाहतूक ठप्प ; पोलिसांचा लाठीचार्ज, नागरिकांची दगडफेक
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बदलापूर (Badlapur) येथील आदर्श या नामांकीत शाळेतील (Adarsh School)छोट्या शिशु वर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार (sexually assaulted) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात याचे पडसाद उमटत आहेत. पालक आणि नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूकही ठप्प (Public transport stopped) झाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्ज केला असून नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे.
पीडित मुलीने आपल्या पाल्यांना शाळेतील एका व्यक्तीने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्या मुलीच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांना याबाबत माहिती दिली. त्या पालकांनाही संशय आल्याने त्यांनी आपल्या मुलीला बदलापूर एका रूग्णालयात तपासणीसाठी नेले. या तपासणीनंतर रूग्णालयाने त्यांना संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याबाबत दुजोरा दिला. त्यानंतर पालकांनी बदलापूर पूर्व पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यात दिरंगाई केली, असा आरोप पालकांनी केला. अखेर याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सकाळपासूनच शहरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पीडित मुलींना न्याय देण्यासाठी नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले तर संतप्त पालकांनीही शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केले. या घटनेच्या निषेधार्थ बदलापुरातील रिक्षाचालकांनीही बंद पुकारला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कडक नियम बनवण्यात येतील. शिक्षक, पोलीस कोणीही असू दे, अशा प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यासंदर्भात कठोर कायदे आणले जातील. जेणेकरुन असे करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.
याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक आणि मुलांना ने आण करणा-या सेविकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच कंत्राटी पद्धतीने सुरु असलेला सफाई कामगारांचा ठेकाही रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणा-या पोलिस निरिक्षकाचीही बदली करण्यात आली आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तर राज्यातील शाळांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
-----------------------
अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक कायदे करणे गरजेचे आहे.ज्या शाळा या कायद्याची अंमलबजावणीकरणार नाहीतेत्यांची मान्यता शासनाने काढून घ्यावी. तसेच शाळेत कंत्राटी पध्दतीने नियुक्त केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या घटना घडतात.त्यामुळे कंत्राटी पध्दत बंद करावी.तसेच पोलीस पडताळणीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू नये. सीसीटीव्ही बंद ठेवणाऱ्या शाळांना दंड करावा.
- दिलीप सिंग विश्वकर्मा , महापेरेंट्स पालक संघटना, पुणे