मुंबई विद्यापीठ: विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन थेट कुलगुरूंकडून 

महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी विद्यापीठात ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

मुंबई विद्यापीठ: विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन थेट कुलगुरूंकडून 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University)पदवी आणि पदव्युत्तर  विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक बाबींशी निगडीत प्रश्न, शंका, समस्या यांचे निरसन आता थेट कुलगुरू करतील. मुंबई विद्यापीठाने ‘कुलगुरू संवाद’ (Vice Chancellor Samvad initiative)या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता थेट कुलगुरूंशी संवाद साधता येणार आहे.

महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी विद्यापीठात ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मुंबई विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रविष्ठ झासलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक बाबींशी निगडीत प्रश्न, शंका, समस्या यांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठात विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठातील सर्व बिगर संलग्नित महाविद्यालयात तीन आणि चार वर्षांचे सर्व विद्याशाखेचे अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. या अनुषंगाने विद्यापीठाने ठरवून दिलेल्या सहा व्हर्टिकल (घटक) नुसार विद्यार्थ्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध मेजर, मायनर, ओपन इलेक्टिव्ह, व्होकेशनल स्कील कोर्सेस, एबिलिटी एनहान्समेंट कोर्सेससह भारतीय ज्ञान प्रणाली आणि कार्यांतर्गत प्रशिक्षण अशा विविध सहा व्हर्टिकल मधील विषयांबाबतही या कार्यक्रमाच्या माध्यमातून  मार्गदर्शन केले जाणार आहे.