मेहनत पाण्यात : उपमुख्यमंत्र्याच्या ताफ्यामुळे जेईईच्या अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली

पवन कल्याण यांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे ट्रॅफिक जॅम झाले आणि ५० हून अधिक विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब झाला. JEE (Main) 2025 ची परीक्षा देता न आल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अडचणीत आले आहे.

मेहनत पाण्यात : उपमुख्यमंत्र्याच्या ताफ्यामुळे जेईईच्या अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Deputy Chief Minister Pawan Kalyan) यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी मार्गातील वाहतूक थांबवण्यात आली, मात्र यामुळे काही विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला,असा आरोप केला जात आहे.  पवन कल्याण यांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे ट्रॅफिक जॅम (Traffic jam) झाले आणि ५० हून अधिक विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब झाला. JEE (Main) 2025 (JEE Main 2025) ची परीक्षा देता न आल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अडचणीत आले आहे. ही घटना विशाखापट्टणम येथे घडली आहे. 

ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्यांनी माध्यमांना सांगितले की, आम्ही वाहतूक कोंडीमध्ये अडकलो. पवन कल्याण या रस्त्यावरून जाणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक रोखण्यात आली होती. ताफ्यासाठी या ठिकाणचे रस्ते मोकळे करण्यात आले. सकाळी ७ : ५० वाजता आम्ही NAD जंक्शनवर पोहोचलो होतो. मात्र, जाण्याच्या मार्गावरील सर्व वाहतूक थांबण्यात आल्याने आम्हाला परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे आम्हाला परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला नाही. 

यामुळे जवळपास ३०-५० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. वर्षे, दोन-दोन वर्षे अभ्यास करून परीक्षा देता न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे खुप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आम्ही वारंवार विनंती करूनही आम्हाला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही. यातील काही पालकांनी,अशी मागणी केली आहे की, पवन कल्याण यांनी नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा विचार करावा. 

विशाखापट्टणम पोलिसांचे निवेदन 

दरम्यान,  विशाखापट्टणम पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, पवन कल्याण यांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे विद्यार्थ्यांना उशीर झालेला नाही. उपमुख्यमंत्र्यांचा ताफा सकाळी ८:४१ वाजता या परिसरातून पार पडला. तर विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजल्यापासून ८:३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचायचे होते. 

पवन कल्याण यांनी दिले निर्देश 

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी म्हटले आहे की, त्यांच्या दौऱ्यामुळे लोकांना कोणताही त्रास होता कामा नये. त्यांनी पोलिसांना निर्देश दिले की, नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान काही वेळासाठीच वाहतूक थांबवावी. पक्षाने कार्यकर्ते आणि नेत्यांना सांगितले आहे की, क्रेनने पुष्पहार घालण्यासारखे कार्यक्रम करू नयेत. अशी कोणतीही कृती करू नका ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण होईल.