उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्रानंतरही BCM भरतीतील अटी कायम
अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना देखील जाचक अटी मागे घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे लाखो विद्यार्थांना या भरतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) १ हजार ८४६ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेतील (Clerk Post Recruitment Process) जाचक अटी काढून (Remove oppressive conditions) टाकण्याबाबत दोन दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Deputy CM Devendra Fadnavis) दिलेल्या पत्राला पालिका आयुक्त भूषण गगराणी (Commissioner Bhushan Gagrani) अद्याप गंभीरपणे घेतले नसल्याचे यांनी दिसून येत आहे . अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना देखील या जाचक अटी मागे घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे लाखो विद्यार्थांना या भरतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
भरती प्रक्रियेतील जाचक अटी कमी करण्यासंदर्भात उमेदवारांकडून मागणी करण्यात आली होती. दोन दिवसांपुर्वी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या अटी मागे घेण्याचे आदेश दिले . मात्र, आयुक्तांनी उपमुख्यमत्र्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ९ सप्टेंबर रोजी अर्ज करण्याची अंतिम तारीख असताना देखील भरती प्रक्रियेमध्ये कोणतेही बदले झालेले नाहीत. पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण या जाचक अटीमुळे राज्यातील लाखो उमेदवार या भरती प्रक्रियेपासून वंचित राहणार आहेत.
अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस असून काही तास शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो तरुण-तरुणी प्रचंड तणावाखाली असून, मुंबई महानगर पालिकेच्या निर्णयाची वाट बघत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटी मागे घेण्यासाठी आयुक्तांना पत्र दिल्यामुळे उमेदवारांच्या जीवात जीव आला होता.आता अर्ज करण्यास काही तास शिल्लक असताना देखील पालिकेकडून अटी मागे घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अधिकारी जुमानत नाहीत का? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.