TET परीक्षेचे भिजत घोंगडे; परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन; उमेदवारांमध्ये चिंता
शासन टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी की ऑफलाइन पद्धतीने घ्यावे याबाबत चिंतन करत आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवार टीईटी परीक्षा केव्हा घेतली जाणार याच्या प्रतीक्षेत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर मोठा गदारोळ झाला. अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची घोषणा केली. मात्र परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन घ्यावी याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप राज्य शासनाला घेता आला नाही. त्यामुळे टीईटी परीक्षेच्या निर्णयासंदर्भातील भिजत घोंगडे अजूनही राज्य शासनाच्या दालनात पडून आहे. परंतु यामुळे टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जून 2026 मध्ये टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र परीक्षेच्या एक दिवस आधी टीईटी परीक्षेचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पेपर फुटी मुळे राज्यभरात शिक्षक व परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पेपर फुटी प्रकरणे बिहार,उत्तर प्रदेश, हरियाणासह विविध ठिकाणाहून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

टीईटी पेपर फुटीचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याची घोषणा केली. परंतु टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे सहज सोपे नाही. या परीक्षेसाठी सुमारे सहा ते साडेसहा लाख उमेदवार अर्ज करतात. त्यातच एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला सुद्धा मोठा विरोध झाला. त्यामुळे शासन टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी की ऑफलाइन पद्धतीने घ्यावे याबाबत चिंतन करत आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवार टीईटी परीक्षा केव्हा घेतली जाणार याच्या प्रतीक्षेत आहे.
---------------------------------------------------

टीईटी परीक्षेचा पेपर फुटणे हे राज्य शासनाचे अपयश आहे. वर्षातून दोन वेळा परीक्षा घेणे आवश्यक आहे. मात्र, यावर्षी अद्याप एकही परीक्षा झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिक्षकांच्या नोकरीवर गदा आलेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा.
- सचिन डिंबळे, कार्यकारी अध्यक्ष शिक्षक संघ, पुणे
-------------------

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे. उमेदवार परीक्षा देण्याच्या तयारीत आहेत. शासनाने तात्काळ ऑफलाइन पद्धतीने टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. पेपर फुटीची जबाबदारी शासनाची आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकरीवर विनाकारण गदा येऊ नये, याची शासनाने काळजी घ्यावी.
- नंदकुमार सागर,सचिव, मुख्याध्यापक महासंघ,महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा
-----------------------------------------------
टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकांना मर्यादित कालावधीत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. टीईटी परीक्षा घेण्याचा कालावधी लांबवून शासनाने शिक्षकांना वेठीस धरू नये. तात्काळ ऑफलाइन पद्धतीने 2026 वर्ष संपण्यापूर्वी दोन टीईटी परीक्षा घ्याव्यात.
-नारायण शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे