विद्यार्थ्यांनो! उत्तरपत्रिकेची छायाप्रत असल्याशिवाय पुनर्मूल्यांकन होणार नाही
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत विषय शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी; गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणार
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावीचा निकाल (12th result) जाहीर करण्यात आला. या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील, तर अशा विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अर्ज (Application for revaluation) करता येणार आहे. परंतु, त्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक असणार आहे.
विद्यार्थ्यांना छायाप्रत मिळाल्यानंतर त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विहित नमुन्यात प्रति विषय ३०० रुपये प्रमाणे ऑनलाइन शुल्क भरायचा आहे. सदर अर्ज संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीनेच सादर करणे आवश्यक आहे.
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी विविध स्पर्धा परीक्षा,जेईई, नीट प्रवेश पात्रता यांसारख्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना तातडीने पुनर्मूल्यांकनासाठी सहकार्य करण्याच्या सूचना सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत व पुनर्मूल्यांकन तातडीने व प्राधान्याने करून देण्यात येणार आहे.
खेळाडू, एनसीसीसह स्काऊटच्या तब्बल २० हजार ९४३ विद्यार्थ्यांना मिळाले सवलतीचे गुण
या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या खेळाडू, एनसीसी आणि स्काऊट गाईड'च्या पात्र विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले आहेत. तब्बल २० हजार २४३ पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.
बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मिळवण्यासाठी ईमेलद्वारे/संकेतस्थळावरून, हस्तपोहोच किंवा रजिस्टर पोस्टाने यापैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करून मागवावे. त्यानुसारच छायाप्रती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे दि. २० मेपर्यंत विहित नमुन्यात अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. या छायाप्रतीसाठी मिळवण्यासाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क ऑनलाइन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागणार आहे.