वार्षिक परीक्षा एकाचवेळी घेण्याच्या निर्णयामुळे गोंधळ; निकाल लावण्यात अडचणी

SCERT ने शिक्षकांसाठी प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शिकेमध्ये माहिती देण्यात आली आहे.त्यात अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी सत्र संपण्यापूर्वी 15 दिवस आगोदार संकलित मूल्यमापन करावे,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वार्षिक परीक्षा एकाचवेळी घेण्याच्या निर्णयामुळे गोंधळ; निकाल लावण्यात अडचणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) वार्षिक परीक्षा (annual examination)  संकलित चाचणी- २ (नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT) परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले. तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये या परीक्षा एकाच वेळी घेतल्या जाव्यात,असे निर्देश शिक्षण विभागातर्फे देण्यात आले.मात्र, या निर्णयाला शिक्षण क्षेत्रातून कडाडून विरोध होत आहे. तसेच SCERT ने यापूर्वी प्रसिध्द केलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपध्दतीच्या अंमलबजावणीस हा निर्णय मारक ठरत असून शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे गोंधळ उडाला आहे. त्यामुळे राज्यात एकाच वेळी परीक्षा घेण्याचा निर्णय मागे घेण्याची वेळ शिक्षण विभागावर येऊ शकते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत संतत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शिका शिक्षकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.आरटीई कायद्यात बदल केल्यानंतर आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात असून त्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवले जात आहे. मात्र, आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार पहिली ते चौथी आणि सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केव्हा करावे, याबाबत SCERT ने शिक्षकांसाठी प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शिकेमध्ये माहिती देण्यात आली आहे.त्यात अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी सत्र संपण्यापूर्वी 15 दिवस आगोदार संकलित मूल्यमापन करावे,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थी सत्र संपण्यापूर्वी एखाद्या विषयात अभ्यासात मागे राहत असतील तर त्याचा अभ्यास करून घेण्यासाठी हा अवधी निश्चित करण्यात आला आहे.मात्र, वार्षिक परीक्षा 25 एप्रिल रोजी संपल्यानंतर या विद्यार्थ्यांचा अभ्यास केव्हा आणि कसा करून घ्यावा,असा प्रश्न निर्माण होतो. तसेच परीक्षा घेण्याची जाबाबदारी ही शिक्षक व मुख्याध्यापकांची आहे. त्यामुळे या घटकांना विश्वासात घेऊन एकाच वेळी परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेणे अपेक्षित होते.मात्र, शिक्षण विभागाने या घटकांशी चर्चा न करता निर्णय जाहीर केला.त्यामुळे मुख्याध्यापक संघटना नाराज आहे. 

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी आहे. कमी मनुष्यबळात शाळा चालवल्या जात आहेत. एका शिक्षकांकडे एकापेक्षा अधिक विषय आहेत.त्यामुळे काही शाळांमध्ये एका शिक्षकाला दररोज सुमारे 250-300 उत्तरपत्रिका तपासाव्या लागू शकतात.परीक्षा झालेल्या दिवशी सुध्दा या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घेतल्या तरी अनेक शिक्षकांना दिलेल्या अशैक्षणिक कामामुळे या उत्तरपत्रिका तपासणे शक्य नाही. तसेच परीक्षा 25 एप्रिल रोजी संपल्यावर केवळ पाच दिवसांत निकाल तयार करणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे या निर्णयास विविध संघटनांकडून विरोध केला जात आहे. 

--------------------------------------------

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यापूर्वी प्रसिध्द केलेल्या संतत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका क्रमांक -2 मध्ये दिलेल्या सूचना आणि  एकाचवेळी वार्षिक परीक्षा घेण्याबाबतचे पत्रक क्लॅश होत आहे. SCERT शिक्षक मार्गदर्शिका क्रमांक -2  मधील सूचना मागे घेतलेल्या नाहीत किंवा त्यात सुधारणा केलेल्या नाहीत.त्यामुळे शिक्षण विभागाने याबाबत पुनर्विचार करावा.   

- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ  

--------------------------

या निर्णयामुळे केवळ शिक्षकच नाही तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. निकाल तयार करण्यासाठी दिलेला कालावधी हा खूप कमी आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान सुट्टी देण्याची आवश्यकता नाही. त्यातच अनेक पालकांनी 15 एप्रिलपर्यंत परीक्षा संपणार हे विचारात घेऊन गावी जाण्यासाठी गाड्यांचे रिझर्वेशन करून ठेवले आहे.त्यामुळे काही पालक याबाबत विचारणा करत आहेत. 

- शिवाजी शिंदे, अध्यक्ष, पुणे शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे