दहावीची भूगोलाची प्रश्नपत्रिका गेली चोरली; ssc बोर्डाचा मोठा निर्णय

भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका कुठेही व्हायरल झाली नसल्याने भूगोल विषयाचा पेपर नियोजित वेळेत होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले.

दहावीची भूगोलाची प्रश्नपत्रिका गेली चोरली; ssc बोर्डाचा मोठा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्राची (Vidyamandir School Examination Center) 'स्ट्राँग रूम' (Sangola Strong Room) फोडून एका विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका चोरल्याचे (50 Question Papers Stolen) उघडकीस आले. मात्र, संबंधित भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका कुठेही व्हायरल झाली नसल्याने भूगोल विषयाचा पेपर नियोजित वेळेत होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले. दरम्यान परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने संबंधित परीक्षा केंद्र प्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा घेतली जात असून उद्या भूगोलाचा पेपर नियोजित वेळेत होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात एका केंद्रावर स्ट्रॉंग रूम फोडून प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यामुळे उद्या होणारा भूगोलाचा पेपर रद्द होणार की नियोजित वेळेत घेतला जाणार ? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, हा पेपर नियोजित वेळेत होणार असल्याचे राज्य मंडळांने स्पष्ट केले आहे. 

सांगोल्यातील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समजल्यानंतर पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. केलेल्या पाहणीमध्ये त्यांना संबंधित परीक्षा केंद्रातील स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे आढळून आले. मात्र, संबंधित शाळा ही रस्त्यालगत असल्याने जवळील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक विद्यार्थी प्रश्नपत्रिका घेऊन जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलीस पथक संबंधित विद्यार्थ्यांचा तपास करत आहेत. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरे नसताना स्ट्रॉंग रूम मध्ये प्रश्नपत्रिका ठेवल्या प्रकरणी संबंधित केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे उकिरडे यांनी सांगितले.