राज्यातील 5 लाखांहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रिये बाहेर; ऑनलाईन प्रवेश सुरू
पुणे विभागातून अकरावी प्रवेशासाठी दुसरा भाग भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 68 हजार 134 एवढी आहे. तर पुणे विभागातून इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 49 हजार 753 एवढी आहे. त्यामुळे एकट्या पुणे विभागातील 81 हजार 619 विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी संतयाने मुदतवाढ दिली जात असली तरी अजूनही राज्यातील 5 लाख 16 हजारांहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर आहेत. राज्यातील 14 लाख वीस हजार 486 विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत.तर 25 मे पर्यंत राज्यातील 9 लाख 4 हजार 189 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता.त्यामुळे 5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केवळ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील 12 लाख 49 हजार 506 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील 10 लाख 8 हजार 447 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरला आहे. तर 9 लाख 4 हजार 189 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला आहे. प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरलेले विद्यार्थीच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कॅप राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे लाखो विद्यार्थी यंदाही अकरावी प्रवेश प्रक्रियेपासून लांब राहणार असल्याचे दिसून येत आहे.
एकट्या पुणे विभागाचा विचार केला तर पुणे विभागातून अकरावी प्रवेशासाठी दुसरा भाग भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 68 हजार 134 एवढी आहे. तर पुणे विभागातून इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 49 हजार 753 एवढी आहे. त्यामुळे एकट्या पुणे विभागातील 81 हजार 619 विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे. मुंबई विभागातून इयत्ता दहावीमध्ये 3 लाख 7 हजार 480 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर मुंबई विभागातून अकरावी प्रवेशासाठी केवळ 2 लाख 16 हजार 985 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला आहे. त्यामुळे मुंबई विभागातील 90 हजार 495 विद्यार्थी अजूनही अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर आहेत.
राज्यातील अनेक विद्यार्थी आपल्या घराजवळील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतात. परंतु ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंती क्रमानुसार त्यांना प्रवेश अलर्ट होतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना घरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. ग्रामीण भागात अनेक पालक मुलींना घरापासून दूरवरील अंतरावर प्रवेश घेऊन देण्यास तयार नसतात. त्यामुळे शिक्षण विभागाला मागील वर्षे अकरावी प्रवेशासाठी अनेक फेऱ्या घ्याव्या लागल्या होत्या.यंदाही अनेक फेऱ्या घ्याव्या लागतील,असे चित्र या आकडेवारीवरून दिसून येत आहे.