नव्या शैक्षणिक वर्षात पालकांना मोठा झटका; शालेय साहित्य २० ते २५ टक्क्यांनी महागले
एका मुलासाठी शालेय साहित्यावर यंदा गेल्या वर्षीपेक्षा १५०० ते ३००० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च येणार आहे. खासगी शाळांमध्ये शाळा स्वतः किंवा नियुक्त विक्रेत्यांकडून साहित्य खरेदी करण्यास भाग पाडल्याने खर्च अधिक वाढतो, असे पालकांचे म्हणणे आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या (Academic year 2026-27) सुरुवातीला शालेय साहित्याच्या किमतीत लक्षणीय वाढ (Increase in the prices of school supplies) झाली आहे. अभ्यासक्रम पूरक पुस्तके, सराव संच, वह्या, दप्तर, चित्रकला साहित्य, पेन-पेन्सिल यासह इतर स्टेशनरीच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांच्या आर्थिक गणिते बिघडली (Financial calculations have gone awry) आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत शालेय पुस्तकांच्या किंमतीत सरासरी २५ टक्के वाढ झाली आहे. वह्या आणि प्रिंटेड नोटबुक्सच्या भावातही २० ते २५ टक्क्यांची वाढ दिसत आहे. कच्च्या मालाच्या (पेपर) वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि इतर उत्पादन खर्चामुळे ही दरवाढ झाल्याचे पुणे शहरांतील पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले.
एका मुलासाठी शालेय साहित्यावर यंदा गेल्या वर्षीपेक्षा १५०० ते ३००० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च येणार आहे. खासगी शाळांमध्ये शाळा स्वतः किंवा नियुक्त विक्रेत्यांकडून साहित्य खरेदी करण्यास भाग पाडल्याने खर्च अधिक वाढतो, असे पालकांचे म्हणणे आहे. यामुळे अनेक पालक जुनी पुस्तके किंवा कमी किमतीच्या पर्यायांचा शोध घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने खासगी शाळांना गणवेश आणि पुस्तके विशिष्ट दुकानांमधून किंवा शाळेद्वारे विक्री करण्यास सक्ती न करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. तरीही अनेक शाळा याचे पालन करत नसल्याच्या तक्रारी पालक करत आहेत.
कागदाच्या आयात आणि उत्पादन खर्चात वाढ, जीएसटी संबंधित बदल आणि महागाई यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पालक संघटनांनी सरकारला दरवाढ नियंत्रित करण्याची आणि शाळांकडून जबरदस्ती थांबवण्याची मागणी केली आहे. बाजारातील विविध दुकानांच्या भावाशी तुलना करा, जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करा आणि शक्यतो ऑनलाइन पर्याय तपासा, असे आवाहन पालक संघटना करत आहेत. तरीही यंदा शालेय खर्चात २०-३० टक्क्यांची वाढ अपरिहार्य असल्याचे दिसत आहे. ही दरवाढ मध्यमवर्गीय कुटुंबांवर अधिक भार टाकणारी ठरली आहे. नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षणावरील खर्च हा सर्वसामान्य पालकांसाठी मोठी कसोटी बनली आहे.