MPSC साठी 'प्रतिभा सेतू' योजना सुरू करा; आमदार विक्रम पाचपुते यांची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा प्रतिभा सेतू योजना सुरू करावी, या मागणीचे निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Central Public Service Commission)नुकतीच प्रतिभा सेतू (Pratibha Setu)नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेतून यूपीएससीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेले पण अंतिम निवड न झालेले उमेदवार यांची माहिती एकत्रित करून खाजगी आणि सरकारी संस्थांशी शेअर केली जाते. त्यामुळे या उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) सुद्धा प्रतिभा सेतू योजना सुरू करावी, या मागणीचे निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते (MLA Vikram Pachpute)यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
यूपीएससी प्रमाणे एमपीएससी परीक्षा सुद्धा अत्यंत स्पर्धात्मक आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी राज्यसेवा गट ब, गट क अशा विविध परीक्षांसाठी अर्ज करतात.परंतु,अंतिम निवड फक्त काहीच उमेदवारांची होते. मुलाखतीपर्यंत पोहोचलेले किंवा अंतिम निवड यादीत थोडक्यात समाविष्ट होऊ न शकलेले अनेक उमेदवार गुणवत्ता पूर्ण असतात. आशा उमेदवारांचा वापर इतर सरकारी व खाजगी क्षेत्रात करणे शक्य आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील उमेदवार माहिती पोर्टल विकसित करावे,अशी मागणी विक्रम पाचपुते यांनी निवेदनाद्वारे केली.
राज्यसेवा गट ब, गट क अशा परीक्षेतील मुख्य परीक्षा किंवा मुलाखत दिलेले पण अपयशी ठरलेल्या उमेदवारांची माहिती एकत्रित करणे. उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी, कौशल्य, इत्यादी माहिती संकलित करणे, संबंधित माहिती खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था, सीएसआर प्रकल्प, सरकारी, कंत्राटी भरती, खासगी संस्था, महापालिका, जिल्हा परिषदा, सहकारी संस्था यांच्याशी शेअर करणे. तात्पुरत्या कंत्राटी प्रकल्प आधारित भरतीसाठी या माहितीचा उपयोग करणे, आवश्यक आहे. यासारखे पोर्टल विकसित केल्यास ही योजना राज्यातील सामाजिक समता प्रशासकीय प्रतिनिधित्व व विद्यार्थी सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल त्याचप्रमाणे राज्याच्या प्रशासनात दर्जेदार मनुष्यबळाचा उपयोग होईल तरी यासाठी शासन स्तरावर ही योजना राबवण्याबाबत विचार व्हावा, या मागणीचे निवेदन विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यावर मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.