ग्रामीण व दुर्गम भागातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विरोध
सर्वच विद्यार्थ्यांकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.अनेक कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचे १०० रुपये शुल्क आणि सायबर कॅफेचे २००-३०० रुपयांचे देयक अदा करणे अडचणीचे ठरणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
11th Admission: इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (11th online admission process)राबवताना पूर्व तयारीचा अभाव दिसून येत असून ग्रामीण व दुर्गम भागातील (rural and remote areas) विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरीता नसलेली साधनसिद्धता, प्रवेश प्रक्रियेस लागणारा खर्च करण्याची असमर्थता आणि ग्रामीण भागात सद्यस्थितीत पारदर्शकतेने चालणारे अकरावीचे प्रवेश, या सर्व स्थितीचा विचार करून ग्रामीण भागासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अमलात आणू नये, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार ज.मो. अभ्यंकर (MLA J.M. Abhyankar)यांनी केले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेतील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.
ग्रामीण भागातील बऱ्याच गावांत इंटरनेट सेवा अनुलब्ध नसल्यामुळे, या विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावी जावून सायबर कॅफेतून २०० - ३०० रुपये खर्च करून अर्ज सादर करावा लागेल. बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ अथवा त्यांच्या पालकांजवळ ऑनलाईन प्रवेशास योग्य असे मोबाईल उपलब्ध नाहीत.सर्वच विद्यार्थ्यांकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.अनेक कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचे १०० रुपये शुल्क आणि सायबर कॅफेचे २००-३०० रुपयांचे देयक अदा करणे अडचणीचे ठरणार आहे. यापूर्वीच्या अनुभवानुसार शहरातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सप्टेंबर महिना उजाडतो. बऱ्याचदा हे प्रवेश ऑक्टोंबरपर्यंत चालू राहील्यामुळे प्रथम सत्रात ११ वी चे वर्ग फारच कमी काळ भरविले जातात. परिणामतः इयत्ता ११ वी चा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कालावधी उपलब्ध होत नाहीत. तोच प्रकार ग्रामीण भागातील ११ वीच्या वर्गांसाठी होईल, असे अभ्यंकर
सद्यस्थितीत ग्रामीण भागातील अथवा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंमलात नसलेल्या सर्व ठिकाणी शाळाप्रमुख ऑफ लाईन प्रवेश पंधरा दिवसात पूर्ण करून वर्ग कार्य जुलैच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात सुरु करतात. ऑनलाईन प्रवेशामुळे वर्ग कामास उशिरा प्रारंभ होईल. ऑनलाईन प्रवेश पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अशा ग्रामिण भागात शासनाचे संबंधित अधिकारी उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे योग्य त्या मार्गदर्शनाअभावी अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकणार नाही आणि त्यांना ११ वी प्रवेशाला मुकावे लागेल.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंमलात आणण्यापूर्वी सर्व मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन होणे आवश्यक होते. अडचणी निर्माण झाल्यास, त्याबाबत कुठे आणि कुणाकडे मार्गदर्शन, मागावे याबद्दलचा तपशिल संबंधितांना अवगत करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे कार्यवाही झालेली नाही.
ग्रामीण भागातील ११ वी चे प्रवेश देतांना मुख्याद्यापक गुणवत्तेच्या निकषाकडे दुर्लक्ष करतात अथवा प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसते, अशा तक्रारी ऐकावयास मिळत नाहीत. उलट ११ वी प्रवेशाकरिता उपलब्ध जागा अधिक आणि प्रवेशेच्छ्र विद्यार्थी कमी अशी स्थिती असल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना सहजपणे ११ वी मध्ये प्रवेश मिळतो.त्यामुळे ग्रामीण व दूर्गम भागासाठी अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवू नये,अशी मागणी अभ्यंकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.