MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी जरांगे पाटील पुण्यात; नदीपात्रात तोबा गर्दी
विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणे चुकीचे आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल झाल्यानंतर नदीपात्रात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची तोबा गर्दी जमा झाली. या गर्दीला मनोज जरांगे पाटील संबोधित करत आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
"एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्यांची चूक नसतानाही त्रास दिला जातोय. शासनाच्या चुकीमुळे एक ते दीड लाख एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार असाल तर मोठी शोकांतिका आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न तातडीने सोडवा असा निरोप मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे " असे म्हणत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल झाले आहेत. नदीपात्रात हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे.
शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपले सर्व दौरे रद्द करून अचानक मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल झाले. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संयुक्त पूर्व परीक्षेच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्र असणारे अनेक उमेदवार अपात्र ठरत आहेत. वय वाढीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र परीक्षा जवळ आलेली असताना शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. अखेर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. आंदोलन दाबण्यासाठी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले, असा आरोप केला जात आहे.
विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणे चुकीचे आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल झाल्यानंतर नदीपात्रात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची तोबा गर्दी जमा झाली. या गर्दीला मनोज जरांगे पाटील संबोधित करत आहेत.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यात दाखल झाल्यामुळे शासनाला याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. लवकरच या संदर्भात शासनाकडून निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ मधील वयोमर्यादेच्या अन्यायकारक अटीविरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले. परीक्षा पद्धतीत अचानक झालेल्या बदलामुळे आणि १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा ग्राह्य धरल्याने अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरत असल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. या मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससी परीक्षार्थींकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी जरांगे पाटील पुण्यात दाखल झाले आहेत.