बारावीचा निकाल कमी लागल्याने प्रथम वर्षाचे प्रवेश घटणार; सीएचबी प्राध्यापकांचे काय होणार?
चालू शैक्षणिक वर्षात तरी सीएसबी प्राध्यापकांची नियुक्ती करावी लागणार आहे. असे असले तरी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तरच प्राध्यापकांची आवश्यकता भासते. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढली तरच सीएसबी प्राध्यापकांची नियुक्ती होणार आहे. बारावीचा घटलेला निकाल हा महाविद्यालयातील प्रवेशावर निश्चितच परिणाम करणारा ठरणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला यंदा निकालात 2.9 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून निकालात सातत्याने घट होत असल्याने चिंता व्यक्त केले जात आहे. त्यातच विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळत असल्याने पारंपरिक अभ्यासक्रमाची महाविद्यालय ओस पडत चालली आहेत. विद्यार्थीच नसतील तर प्राध्यापकांचे काय काम? त्यामुळे अनेक महाविद्यालयातील सीएचबी प्राध्यापकांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे विभागाचा निकाल यंदा वाढला आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल 93.32% लागला आहे. त्यात पुणे शहर पश्चिम भागातील 23 हजार 292 विद्यार्थी इयत्ता बारावी उत्तीर्ण झाले आहेत. तर पुणे शहर पूर्व भागातील 21 हजार 296 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड परिसरातील 18 हजार 385 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळणार आहेत. हवेली तालुक्यातील बारा हजार 315 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमासाठी किती विद्यार्थी मिळतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकट्या पुणे शहरात ही स्थिती नाही तर राज्यातील इतर शहरात हीच परिस्थिती आहे.

राज्य शासनाने प्राध्यापक भरतीची घोषणा केली असली तरी अद्याप प्रत्यक्षात रोस्टर तपासून जाहिराती प्रसिद्ध होण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. या प्रक्रियेसाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तसेच प्राध्यापक भरती प्रक्रियेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची प्रत्यक्षात नियुक्ती होऊन महाविद्यालयात रुजू होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात तरी सीएसबी प्राध्यापकांची नियुक्ती करावी लागणार आहे. असे असले तरी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तरच प्राध्यापकांची आवश्यकता भासते. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढली तरच सीएसबी प्राध्यापकांची नियुक्ती होणार आहे. बारावीचा घटलेला निकाल हा महाविद्यालयातील प्रवेशावर निश्चितच परिणाम करणारा ठरणार आहे. त्यामुळे पारंपरिक महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रोजगाराचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
------------
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्कूल कनेक्ट हा कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये लवकरच स्कूल कनेक्ट कार्यक्रम आयोजित करून एनईपी बाबत विद्यार्थी व पालकांना माहिती दिली जाईल.तसेच महाविद्यालयांमधील प्रवेश वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- डॉ. पराग काळकर, प्र. कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
---------
बारावीचा घटत चाललेला निकाल ही अत्यंत चिंतेची बाब असून त्याचा परिणाम प्रथम वर्षाच्या प्रवेशावर होणार आहे. पारंपरिक अभ्यासक्रम पूर्ण करून तत्काळ रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. बेसिक सायन्स निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा कमी झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील कला वाणिज्य शाखेच्या तुकड्या सुध्दा बंद पडत चालल्या आहेत. यावर गांभीर्याने विचार करावा लागेल.
डॉ. सुधाकर जाधवर, अध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
-------------------
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा निकालाच्या एकूण टक्केवारी बरोबरच विद्यार्थ्यांना मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी सुद्धा कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याऐवजी विद्यार्थी पुन्हा आर्ट्स कॉमर्स सायन्स या पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतील अशी अपेक्षा आहे.
- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉर्डन कॉलेज, गणेशखिंड, पुणे