12th Result : मुंबईची पोरं सर्वाधिक नापास, तर 'लातूर पॅटर्न' फेल? सर्वात कमी निकाल

राज्यात यंदा 14 लाख 33 हजार 58 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसरीकडे 1 लाख 46 हजार 215 विद्यार्थी अनुत्तीर्ण म्हणजेच नापास झाले आहेत.

12th Result : मुंबईची पोरं सर्वाधिक नापास, तर 'लातूर पॅटर्न' फेल? सर्वात कमी निकाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बारावी परिक्षेचा निकाल (12th exam results) नुकताच लागला आहे. या निकालात सर्वात जास्त मुंबई विभागातील विद्यार्थी नापास (Failed Students in Mumbai) झाल्याचे समोर आले आहेत. तर दुसरीकडे 'लातूर पॅटर्न'चा (Latur Pattern) गाजावाजा करणाऱ्या लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (Results in the Latur Division are low) लागल्याचे समोर आले आहे. राज्याच्या शैक्षणिक चिंतेत (Educational concerns) भर घालणारी आकडेवारी समोर आल्याने शिक्षणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात यंदा 14 लाख 33 हजार 58 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसरीकडे 1 लाख 46 हजार 215 विद्यार्थी अनुत्तीर्ण म्हणजेच नापास झाले आहेत. राज्याचा एकूण निकाल 89.79% लागला असला, तरी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

मुंबई विभागातून सर्वाधिक 32 हजार 86 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे विभागात 21 हजार 146 आणि नाशिक विभागात 15 हजार 13 विद्यार्थी नापास झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% लागला आहे. तेथे 14 हजार 250 विद्यार्थी अपयशी ठरले आहेत. ही आकडेवारी पाहिली असता मुंबई विभागात सर्वात जास्त विद्यार्थी नापास झाले आहेत. 

मुंबई विभागात सर्वाधिक 32 हजार 086 विद्यार्थी नापास झाले असून, महानगरातील शिक्षणाच्या दर्जाबाबत चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या एक लाखाच्या पार गेली असून, हे प्रमाण मुलींच्या तुलनेत दुप्पट आहे. लातूर विभागाची घसरणही या निमित्ताने ठळकपणे समोर आली आहे.

निकालाच्या टक्केवारीप्रमाणेच नापास मुलांची संख्या मोठी आहे. यंदा 1 लाख 40 मुले अनुत्तीर्ण झाली आहेत. तर मुलींच्या नापास होण्याचे प्रमाण त्यामानाने खूप कमी असून 46 हजार 175 मुली अनुत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांत विद्यार्थिनी बाजी मारली. मात्र, नापास होण्यामध्ये मुलांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.

बारावीच्या निकालामध्ये १०० टक्के यशाची पताका फडकवणाऱ्या महाविद्यालयांची चर्चा सुरू असताना मुंबई विभागातील १० कनिष्ठ महाविद्यालयांवर 'शून्य टक्के' निकालाची नामुष्की ओढवली आहे. यामध्ये तीन महाविद्यालयांचा संपूर्ण निकाल शून्य टक्के लागला असून सात महाविद्यालयांतील विशिष्ट शाखांमधून एकही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्याचे वास्तव समोर आले आहे.