उन्हामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सकाळी ४ तासच ; या तारखेनंतर होणार सुरूवात

दररोज सकाळी सहा ते १० या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

उन्हामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सकाळी ४ तासच  ; या तारखेनंतर होणार सुरूवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरु असून राज्यातील सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपेल आणि त्यानंतर पोलीस भरतीची (Police Recruitment)  मैदानी चाचणी (Ground Test) घेण्यात येणार आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत (Intensity of summer)असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

राज्यातील ५ व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपणार आहे. त्यानंतर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. साधारणत: ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून, ऑक्टोबरअखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीत १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील. या चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. १०० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण अपेक्षित आहेत. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून, त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.