कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; १० जण बेपत्ता..
कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने आत्तापर्यंत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल ८ ते १० विद्यार्थी बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेत आत्तापर्यंत दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
दिल्ली येथील एका आयएएस स्टडी सेंटरमध्ये (IAS Study Center) धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये अचानक पाणी साचल्याने (Study center basement flooded) आत्तापर्यंत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू (3 students died) झाला आहे. तर तब्बल ८ ते १० विद्यार्थी बेपत्ता (8 to 10 students missing) असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेत आत्तापर्यंत दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बचाव पथकाने तिघांचे मृत्यदेह बाहेर काढले असून शोध मोहित सुरू आहे.
दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमधील राव आयएएस स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ वर पोहचली आहे. बचाव पथकाने तिसऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला आहे. घटनास्थळी शोध मोहिम सुरू आहे. या घटनेप्रकरणी विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरबाहेर आंदोलन करण्यास सुरूवात केली. अशातच या प्रकरणात विद्यार्थ्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. फक्त तिघांचा नाही तर ८ ते १० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे दिल्ली शहरासह देशात मोठी खळबळ उडाली आहे.
कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये वाचनालय असल्याचे तपासात समोर आले आहे. वाचनालयामध्ये साधारणपणे ३० ते ३५ मुले बसलेली असायची. अचानक बेसमेंटमध्ये वेगाने पाणी भरू लागले. बेसमेंटमधील बाकांवर विद्यार्थी उभे होते. पाण्याच्या दाबाने बेसमेंटमधील काच फुटू लागली. बेसमेंटमध्ये पाणी वाढू लागल्यामुळे त्याठिकाणी असणारे काही विद्यार्थी पळत बाहेर पडले. पण काही जण अडकले. त्यामधील तिघांचा मृत्यू झाला. बेसमेंटमध्ये असणाऱ्या वाचनालयामध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे. याठिकाणी बायोमॅट्रिक यंत्रणा देखील बसवली आहे.
राव कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी सांगितले की, येथे पाणी साचण्याची समस्या नवीन नाही. यापूर्वीच्या पावसात अनेकवेळा पार्किंगमध्ये पाणी साचले होते. अनेकवेळा बेसमेंटमध्ये पाणी शिरले. असे असतानाही कोचिंग सेंटर प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. या घटनेवरून आता विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत.
या कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची न्याय दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. दिल्ली सरकारने मुख्य सचिवांना २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश जारी करताना महसूल मंत्री आतिशी म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्याची तातडीने चौकशी करण्यात यावी. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.