CBSE : कॉलेज-विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक मदत
महाविद्यालय, विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी https://scholarships.gov.in/ या वेबसाइटवर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करु शकणार आहे. या योजनेत पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन वर्षांसाठी १२ हजार रुपये मिळणार आहे. त्यानंतर पदवीत्तर पदवीसाठी २० हजार रुपये मिळणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण (Undergraduate or postgraduate education) घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (students) महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) विद्यार्थ्यांना वीस हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती (Scholarships) मिळू शकणार आहे. सीबीएसईने ही खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ‘सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड यूनिव्हर्सिटी स्टूडेंट्स (CSSS) असे असणार आहे.
काय आहे योजना ?
सीबीएसईने एक नोटीस प्रसिद्ध केली आहे त्यानुसार,महाविद्यालय, विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी https://scholarships.gov.in/ या वेबसाइटवर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करु शकणार आहे. या योजनेत पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन वर्षांसाठी १२ हजार रुपये मिळणार आहे. त्यानंतर पदवीत्तर पदवीसाठी २० हजार रुपये मिळणार आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च निघण्यासाठी ही मदत मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती ईडब्लूएस (EWS) वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
असा करा अर्ज
उच्च शिक्षण विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल https://scholarships.gov.in/ ला भेट देऊन या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. सीबीएसईच्या सूचनेनुसार, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालय किंवा विद्यापीठातून त्यांचा अर्ज पडताळून घ्यावा लागणार आहे. विद्यार्थी पडताळणीमध्ये पात्रता निकष पूर्ण करत असेल तर अर्ज करू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे महाविद्यालय किंवा विद्यापीठाला दाखवावी लागणार आहे. पडताळणी केल्याशिवाय अर्ज करता येणार नाही. महाविद्यालय आणि विद्यापीठातील नोडल अधिकाऱ्यांनी पडताळणीचे काम लवकर पूर्ण करावे, असेही सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे.
दरम्यान, सीबीएसईने विद्यार्थ्यांना सल्ला देताना म्हटले आहे की, वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करुन अर्ज भरा. अर्जात कोणतीही चूक झाली तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. यामुळे दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज भरा.
