विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके केव्हा मिळणार ? वह्यांच्या किमती वाढल्या का?

अनेक शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे. पालकही मुलांच्या शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंची खरेदी करण्यात गुंतले आहेत.

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके केव्हा मिळणार ? वह्यांच्या किमती वाढल्या का?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उन्हाळी सुट्टी संपत आली की, मुलांना शाळेत जायची ओढ निर्माण होते. मग त्या पद्धतीने विद्यार्थी तयारी सुरू करतात. नवा गणवेश, नवी पाठ्यपुस्तके, नवे दप्तर या सगळ्याची विद्यार्थ्यांना चाहूल लागली असताना आता राज्यात लवकरच शाळांच्या घंटा खणखणणार आहे. मात्र, शाळा सुरु व्हायला काही दिवस बाकी राहिले असताना अद्यापही शालेय पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध होणार? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे.

राज्य मंडळाच्या अंतर्गत येणार्‍या शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा 9 जून पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेच्या वातावरणात परतण्यासाठी विद्यार्थी आतुर झाले आहेत. अनेक शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे. पालकही मुलांच्या शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंची खरेदी करण्यात गुंतले आहेत.

राज्यातील विविध भागांतील हवामान व उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शाळा सुरू होण्याच्या तारखांमध्ये फरक ठेवण्यात आला आहे. सीबीएसईच्या शाळा बहुतेक शहरी भागात असतात आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होते. राज्य मंडळाच्या शाळा मुख्यतः ग्रामीण भागात आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे त्या थोड्या उशिराने सुरू होणार आहेत. यावर्षीपासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत काही नव्या सुधारणा लागू करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीच्या शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला आहे.त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसात पाठ्यपुस्तके बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी 15 दिवस आधी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके उपलब्ध होतील,असे पुस्तक विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. 

---------------------------

वह्यांच्या किमती ‘जैसे थे’च

अजून पुस्तके विक्रीसाठी बाजारात आलेली नाहीत. पावसामुळे पुस्तके उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. येत्या 3 ते 4 दिवसात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध होतील अशी शक्यता आहे. त्याबरोबरच वह्यांच्या किमती देखील गेल्या वर्षीप्रमाणेच असणार आहे त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. जसे की, क्लासमेटच्या वह्या ७८० रुपये डझन, सुदर्शन, सुंदरमच्या वह्या ६०० ते ६५० रुपये डझन अशा आहेत तर A5 च्या वह्या ५०० ते ५५० डझन असा दर आहे.  

- शालेय साहित्य विक्रेता, अ. ब. चौक, पुणे