शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल १५ दिवसात होणार सुरू : दीपक केसरकरांची विधान परिषदेत माहिती
सध्या शिक्षकांच्या जिल्हा बदलीची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे पंधरा दिवसात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू होईल,
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण मंत्र्यांकडून घोषणा केल्यानंतरही सुमारे वर्षभरापासून रखडलेल्या शिक्षक भरतीच्या (Teacher Recruitment) प्रक्रियेला आणखी १५ दिवस थांबावे लागणार असल्याचे खुद्द शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनीच विधान परिषदेत सांगितले आहे. येत्या १५ दिवसात पवित्र पोर्टल (pavitra portal) सुरू होईल,असे केसरकर यांनी शिक्षकांच्या रिक्त पदावर भरतीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राज्यात शिक्षक भरती केव्हा होणार ? असा प्रश्न बेरोजगार युवकांकडून उपस्थित केला जात आहे. एका तरुणीने याबाबत थेट शिक्षक मंत्र्यांनाच प्रश्न विचारला होता. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यातच विधान परिषदेत व विधान सभेत लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करत आहेत.अनेक शाळांमध्ये सध्या शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
हेही वाचा : धक्कादायक : आदिवासी आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या हातानेच बनवावे लागते जेवण
वरिष्ठ शिक्षकांना दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले होते.त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पुन्हा आणावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सध्या संबंधित शिक्षकांच्या जिल्हा बदलीची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे पंधरा दिवसात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू होईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
अनेक उमेदवार जिल्हा परिषदेच्या जाहिराती केव्हा प्रसिद्ध होणार याची वाट पाहत आहेत, याबाबत केसरकर म्हणाले, लवकरच जिल्हा परिषदेच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. त्यानंतर उमेदवारांकडून त्यांचे चॉईस स्वीकारले जातील. उमेदवारांनी चॉईस दिल्यानंतर त्यांचे समुद्पदेशन करून त्यांना संबंधित ठिकाणी नियुक्त केले जाईल.