Parbhani: कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या 'सोमनाथ सुर्यवंशी'यांचा संशयास्पद मृत्यू

सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी हा LLB चा विद्यार्थी होता. तो पुण्यात चाकण येथे कामानिमित्त राहायला होता. १७ डिसेंबर पासून लाॅ ची परीक्षा असल्याने काही दिवस आधीच तो परभणीत आला होता. दोन दिवसाने पेपर असल्याने जामीन मिळाला म्हणून वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला, परंतु, त्यास जामीन मिळाला नाही.

Parbhani: कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या 'सोमनाथ सुर्यवंशी'यांचा संशयास्पद मृत्यू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

परभणी शहरात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीत सहभागी असल्याच्या संशयावरून पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथचा मृत्यू झाल्याने वातावरण तापले आहे. सोमनाथ हा परभणी शहरातील शिवाजी लाॅ काॅलेज (Shivaji Law College Parbhani) मधील तृतीय वर्षातील विद्यार्थी आहे. कायद्याचे शिक्षण घेऊन समाजसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या उमद्या युवकाचा संशयी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची काही दिवसांपूर्वी एका माथेफिरुने विटंबना केली होती. याप्रकरणी आंबेडकरी अनुयी यांनी संताप व्यक्त करत परभणीत आंदोलन केले होते. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा समावेश होता. 

सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी हा पुण्यात चाकण येथे कामानिमित्त राहायला होता. १७ डिसेंबरपासून लाॅ ची परीक्षा असल्याने काही दिवस आधीच तो परभणीत आला होता. दोन दिवसाने पेपर असल्याने जामीन मिळाला म्हणून वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला, परंतु, त्यास जामीन मिळाला नाही. न्यायालयाने सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, दि. १५ डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला. याप्रकरणी १६ डिसेंबर रोजी आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. परीक्षेसाठी आलेल्या सोमनाथवर पोलिसांनी जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून कारवाई केली. तो न्यायालयीन कोठडीत होता, दोन दिवसांत असे काय घडले की सुस्थितीत असलेल्या या तरुणाचा मृत्यू झाला. यामागे घातपातचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. 

_________________________________

सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू हा शरीरावर अनेक जखमांमुळे झालेल्या रक्तस्त्रावामुळे  झाला असल्याचे  शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. सोमनाथ सुर्यवंशी एक भीमसैनिक आणि वडार समाजातील VBA कार्यकर्ता होता. परभणीतील एका महाविद्यालयातून तो कायद्याचे शिक्षण घेत होता. त्याच्या न्यायासाठी आम्ही लढणार आहोत, त्या पार्श्वभूमीवर आजचा परभणी बंदचा निर्णय घेण्यात आला . 

प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी 
__________________________________

लॉ चा विद्यार्थी असणारा हा तरुण "न्यायालयीन कोठडीत" असताना मरण पावतो, ही अजूनच गंभीर बाब आहे. तो मेला का त्याला मारण्यात आले, हे पोस्टमार्टम झाल्यावर समजून येईलच. पण एक समाज म्हणून आपल्या समोर तोच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो.

जितेंद्र आव्हाड, आमदार (राष्ट्रवादी शरद पवार गट)