विद्यापीठातील 111 प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लवकरच नव्याने सुरू होणार 

एसीबीसी आरक्षण लागू झाल्यामुळे भरती प्रक्रियेत बदल करण्यासाठी विद्यापीठाने मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे.पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

विद्यापीठातील 111 प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लवकरच नव्याने सुरू होणार 
Pune university

एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)111 रिक्त प्राध्यापकांच्या पदांच्या भरती प्रक्रियेला (Recruitment of 111 Vacancies of Professors) लवकरच नव्याने सुरुवात होणार असून 10 टक्के एसीबीसी आरक्षण (SEBC Reservation)लागू करून पुन्हा प्राध्यापक भरतीसाठी विद्यापीठाकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षा असलेल्या उमेदवारांना आणखी काही महिने ही प्रक्रिया पूर्ण होण्याची  वाट पाहावी लागणार आहे. मंत्रालय स्तरावरून पुढील आठवड्यात या प्रक्रियेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे, असे असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले. 

विद्यापीठ अधिष्ठाता नियुक्तीचा घोळ केव्हा संपणार ; कोणत्या जागेसाठी कोणते आरक्षण ?

विद्यापीठातील विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी विद्यापीठाकडून ऑनलाईन पद्धतीने फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. 5 हजाराहून अधिक उमेदवारांनी विद्यापीठाकडे अर्ज जमा केले आहेत. मात्र, एसीबीसी आरक्षण लागू झाल्यामुळे भरती प्रक्रियेत बदल करण्यासाठी विद्यापीठाने मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे.पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे यापूर्वी अर्ज भरलेल्या उमेदवारांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची व नव्याने अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच ज्यांनी अद्याप अर्ज भरला नाही,अशा उमेदवारांना नव्याने अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे.

विद्यापीठातर्फे सध्या प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी केली जात आहे. त्यातील पात्र उमेदवारांचे अर्ज तपासले जात आहेत. परंतु,नव्याने अर्ज भरल्यामुळे आणि अर्जात दुरुस्ती केल्यामुळे विद्यापीठाला ही सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागेल, असे बोलले जात आहे. त्यातच या सर्व प्रक्रियेत काही उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत,अशी खोटी अफवा पसरवली जात आहे. मात्र, उमेदवारांनी अशा कोणत्याही आफावांवर विश्वास ठेवू नये, असेही विद्यापीठातील अधिकारी सांगत आहेत.

भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज स्वीकारणे, प्राप्त झालेल्या अर्जांचे स्क्रुटीनी करणे आणि त्यानंतर मुलाखतीला उमेदवारांना बोलवणे या सर्व प्रक्रियेला बराच कालावधी लागणार आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.परिणामी निवडणुका झाल्यानंतरच प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.