तीन मित्रांची यारी, ठरलीय लय भारी, न्यायाधीशपदी घेतलीय भरारी...
एमपीएससी मार्फत आयोजित केलेल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या झालेल्या मुलाखतीनंतर जाहीर झालेल्या निकालात ११४ विद्यार्थ्यांपैकी ॲड. शुभम कराळे, ॲड. सागर नळकांडे आणि ॲड.अक्षय ताठे या तिघांची निवड झाली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मैत्रीचा कोणताही मोबदला नसतो, मैत्री ही स्वार्थासाठी केली जात नाही तर मैत्री अंधारातही दिशा दाखवते असं म्हणतात. अशाच तीन मित्रांच्या यारीची सोशल माध्यमासह शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण शिरूर तालुक्यातील या तीन मित्रांनी मैत्रीचे अनोखे उदाहरण दाखवून दिले आहे.
जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सोबत असलेल्या मित्रांच्या जोरावर शिक्रापूरचे ॲड. शुभम कराळे, बुरुंजवाडी गावचे ॲड. सागर नळकांडे आणि कारेगावचे रहिवासी ॲड.अक्षय ताठे (Adv. Shubham Karale, Adv. Sagar Nalkande and Adv. Akshay Tathe) या तिघांनीही कायद्याच्या शिक्षणाची सुरुवात विविध महाविद्यालयांतून केली. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एलएल.बी.चे (LLB) शिक्षण पूर्ण केल्यानंतर एलएल.एम.ची (LLM) पदवी देखील प्राप्त केली. त्यानंतर २०२३ साली एमपीएससी मार्फत आयोजित केलेल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेसाठी त्यांनी अनुभवी विधितज्ञ ॲड. गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली.
मार्गदर्शकांच्या सल्ल्यामुळे त्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तम कामगिरी केली. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून नुकत्याच झालेल्या मुलाखतीनंतर जाहीर झालेल्या निकालात ११४ विद्यार्थ्यांपैकी या तिघांची निवड झाली. सोबत वकिली, सोबत अभ्यास आणि एमपीएससीच्या परीक्षेत सोबतच यश मिळवून न्यायाधीशपदापर्यंत (Judge) मजल मारली आहे.
अभ्यासादरम्यान मोबाईलचा कमी वापर
एकत्रित तयारी हे या तिघांच्या यशामागील मुख्य कारण आहे. चार वर्षांच्या नियमित अभ्यासादरम्यान, त्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित करून त्यांनी एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली.
ॲड. शुभम कराळे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील फौजदारी वकिली करत असताना न्यायदानाची जबाबदारी पार पाडत अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवून दिला. त्याचवेळी ॲड. सागर नळकांडे आणि ॲड.अक्षय ताठे यांनी दिवाणी न्यायालयात वकिली केली.
दरम्यान, स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्थी तयारी करत असतात. दिवस-रात्र एक करून यशस्वी होण्यासाठी अभ्यास करुन मेहनत घेत असतात. याच विद्यार्थ्यांपैकी असलेल्या या तिघांच्या यशाची कथा इतरांना प्रेरणा देणारी आहे.