देश अभूतपूर्व वेगाने बदलतोय : ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर

गेल्या दहा वर्षांत भारतातील गरिबी दूर झाल्याचा वर्ल्ड बँकेचा ताजा अहवाल आहे. ही फार मोठी कामगिरी आहे. आता कोणत्याही आईला मुलाच्या जेवणाची काळजी नाही.

देश अभूतपूर्व वेगाने बदलतोय : ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारत देश झपाट्याने पुढे जात असून देशाचा पुनर्जन्म झाला आहे. देश अभूतपूर्व वेगाने बदलतो आहे. या उलट इमरान खान तुरुंगात आहेत म्हणून सुरक्षित आहेत. पाकिस्तानच्या लष्करी प्रशासनाला आव्हान दिलेल्या जवळपास प्रत्येकाला संपवले गेले किंवा त्याला ताब्यात ठेवण्यात आले. पाकिस्तानची चळवळ ही ब्रिटिशांना घालवण्यासाठी नाही, तर हिंदूंपासून वेगळे होण्यासाठी होती. वसाहतवादापासून मुक्त झालेले अनेक देश स्वतंत्र झाले नाहीत. फ्रीडम आणि इंडिपेन्डन्स यात फरक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार एम. जे. अकबर यांनी मांडले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे लिट फेस्टमध्ये पेन, प्रेस अँड पार्लमेंट या विषयावर अकबर बोलत होते. वेदांग अगरवाल यांनी त्यांच्यांशी संवाद साधला. अकबर यांनी देशातील आर्थिक स्थिती, पाकिस्तानातील स्थिती, त्यांची पुस्तके या अनुषंगाने भाष्य केले. 

अकबर म्हणाले, आताच्या काळात माध्यमांत जे दिसते आहे, तेच संसदेत घडते आहे. गेल्या दहा वर्षांत भारतातील गरिबी दूर झाल्याचा वर्ल्ड बँकेचा ताजा अहवाल आहे. ही फार मोठी कामगिरी आहे. आता कोणत्याही आईला मुलाच्या जेवणाची काळजी नाही. त्याच वेळी पाकिस्तानातील गरिबी वाढली असल्याचे अहवालात नमूद केले आहे. कार्यक्षम देश आणि अकार्यक्षम देश यातील हा फरक आहे. हडप्पा, मोहेंजोदारो, सिंधू संस्कृती, गांधार ही संस्कृती पाकिस्तानने उद्ध्वस्त केली. सांस्कृतिक भौगोलिकतेवर आधारित देश इस्लामकडे वळला. वास्तविक धर्म ही वैयक्तिक बाब आहे. प्रत्येक कुटुंबाला अन्न मिळणे हे गरिबीचे उत्तम व्यवस्थापन आहे.