महिलेला गप्प बसविण्यासाठी हिजाब घालण्याची सक्ती:लेखिका बानू मुश्ताक
'कुराणात महिलांना हक्क देण्यात आले आहेत. परंतु प्रेषितांच्या मृत्यूनंतर कुराणाचा चुकीचा अन्वयार्थ लावून महिलांचे हक्क हिसकावून घेतले गेले, असे परखड मत'बुकर' सन्मानप्राप्त लेखिका बानू मुश्ताक यांनी व्यक्त केले
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
'कुराणात महिलांना हक्क देण्यात आले आहेत. परंतु प्रेषितांच्या मृत्यूनंतर कुराणाचा चुकीचा अन्वयार्थ लावून महिलांचे हक्क हिसकावून घेतले गेले. हिजाब घालणे हा सांस्कृतिक रिवाज आहे, त्याला धर्मग्रंथाची मान्यता नाही. चेहरा ही सर्वांची ओळख आहे. तरीही महिलेला गप्प बसविण्यासाठी हिजाब घालण्याची सक्ती केली जाते, अन्यथा तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते,' असे परखड 'मत 'बुकर' सन्मानप्राप्त लेखिका बानू मुश्ताक यांनी व्यक्त केले
पुणे पुस्तक महोत्सवात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित 'पुणे लिट फेस्ट'मध्ये 'व्हॉईसेस बिहाइंड द हॉर्ट लॅम्प : स्टोरीज ऑफ मुस्लिम वुमन, रेझिलियन्स अँड रेझिस्टन्स' या सत्रात बानू मुश्ताक बोलत होत्या. युवा लेखक वेदांत अगरवाल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. दक्षिण भारतीय मुस्लिम महिलांच्या पितृसत्ताक समाजाशी संघर्षाच्या लघुकथा मांडणाऱ्या 'हॉर्ट लॅम्प' या पुस्तकासाठी बानू मुश्ताक यांना 'बुकर' या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा प्रेरणादायी साहित्य प्रवास त्यांनी उलगडला.
'पितृसत्ताक समाजव्यवस्थेत महिलांना कोणतीच किंमत दिली जात नाही, तिच्या कष्टायची कदर केली जात नाही. महिलेने कायम गप्प राहावे, असे या व्यवस्थेला वाटते कारण, तिने प्रश्न विचारायला सुरुवात केल्यास पितृसत्ताक व्यवस्थेचा पाया डळमळीत होईल,' असे परखड मत 'बुकर' सन्मान प्राप्त लेखिका बानू मुश्ताक यांनी व्यक्त केले. 'धर्मनिरपेक्ष देशात राहताना आपल्या खासगी श्रद्धेने लोकशाहीला बाधा पोहोचणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे,' असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
भारतीय महिलांमध्ये भगिनीभाव असतो. पुरुषही महिलांच्या हक्कांसाठी झगडतात. त्यामुळे भारतीय समाज अतिशय चांगला आहे,' असेही त्या म्हणाल्या. 'देशात सध्या भावनिक मुद्देच चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. रोजगार, शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींवर चर्चा होत नाही,' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान,शाळा शिकण्यासाठी वडिलांनी दिलेले प्रोत्साहन, त्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीची भाषा असलेली कन्नड अवगत करण्यासाठी घेतलेले कष्ट, वैवाहिक जीवनानंतरचा संघर्ष, बुरखा सक्तीविरोधात विद्रोह, शेतकरी, दलित व महिलांच्या हक्कांसाठी प्रगतीशील कन्नड लेखकांनी सुरू केलेल्या 'बंड्या' आंदोलनात सक्रिय सहभाग असे आयुष्यातील विविध टप्पे आपल्या जडणघडणीसाठी कारणीभूत ठरल्याचे त्यांनी सांगितले.