CRPF भरती : 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील, तरुणांच्या आयुष्याशी खेळ
पोलीस भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत असा प्रकार घडतो, म्हणजे आतूनच कुठेतरी साखळी जुळलेली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारकडून केवळ घोषणा आणि जाहिराती. प्रत्यक्षात तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरूच आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत आहे. आता हे उघडपणे दिसू लागले आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीतील सीआरपीएफ (SRPF Recruitment) गट 5, दौंड येथील लेखी परीक्षा (Written Examination) म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरला. तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करावी अशी अपेक्षा असताना, १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून (Questions from privately published books) जसेच्या तसे उचलले गेले. मग ही परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट? ही चूक नाही, ही व्यवस्था ढासळल्याची स्पष्ट निशाणी आहे.
सीआरपीएफ परिक्षेत 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. राज्यात एकीकडे बेरोजगारी वाढल्याची दिसून येत आहे. तरुणांच्या हाताला काम मिळत नाहीये. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण रात्रंदिवस मेहनत घेऊन सरकारी नोकरीची तयारी करत आहे. कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमापासून अलिप्त राहून स्पर्धा परिक्षा आणि इतर परिक्षांच्या तयारी करत असतात.मात्र एवढा अभ्यास करुन जर एखाद्या खासगी प्रकाशनातून 85 प्रश्न येत असतील, रात्रंदिवस मेहनत करुन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत असा प्रकार घडतो, म्हणजे आतूनच कुठेतरी साखळी जुळलेली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारकडून केवळ घोषणा आणि जाहिराती. प्रत्यक्षात तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरूच आहे. 3 हजार 977 मुलांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन ही परीक्षा दिली. त्यांच्या स्वप्नांवर असा पाणी फेरणाऱ्यांना वाचवायचे की जबाबदारांना शिक्षा द्यायची, हा निर्णय आता सरकारने घ्यायचा आहे. अन्यथा पारदर्शक भरती हा शब्द केवळ पोस्टरपुरताच उरेल, असं ट्वीट करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
'राज्य राखीव पोलीस दला'च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करीत असतात.आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल ८५ प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.