विद्यार्थ्यांनो, गुगल व वीकिपीडियावर अवलंबून राहू नका!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे आयोजित महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा सोहळा उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांनो, गुगल व वीकिपीडियावर अवलंबून राहू नका!
Prof. Hari Narke

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांनी गुगल (Google) व वीकिपीडियावर (Wikipedia) अवलंबून न राहता वाचनावर भर देत पुराव्यांच्या आधारे मूलभूत संशोधन (Research) करायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) सांगितल्याप्रमाणे ज्ञानाची निर्मिती करणे हे आपले ध्येय असायला हवे, असा संदेश ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे आयोजित महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. हरी नरके बोलत होते.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

‘भारत भाग्यविधाता : ज्योतीराव आणि भीमराव’ या विषयावर प्रा. नरके यांनी मुद्देसूद मांडणी केली. कार्यक्रमात विभागाच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सामूहिक गीते, पथनाट्य व महात्मा फुलेंच्या अखंडांच्या गायनाने या महामानवांना आदरांजली वाहिली. प्रा. नरके यांच्या हस्ते संयुक्त जयंतीच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभागप्रमुख प्रा. महेश देवकर यांनी भूषविले.

प्रा. नरके म्हणाले, जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता आणि गरीब-श्रीमंतांमधील भेद हे या दोघांच्या कार्यांचे तीन समान बिंदू होते. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांचे प्रश्न, स्त्री-पुरुष समानता, मानवी हक्क, सामाजिक न्याय व विकास या क्षेत्रात या महामानवांनी काळाच्या पुढे जाऊन दिलेले योगदान त्यांनी अधोरेखित केले. ‘महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारताचे विकासपुरुष आहेत’ असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. 

हेही वाचा : दहशतवादी कृत्यांना थारा देणाऱ्या शाळेची खैर नाही; शिक्षण विभागाचे अधिकारी पोहचले शाळेत

जयंतीनिमित्त मागील आठवडाभर विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. ९ एप्रिल रोजी सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत विभागात चौदा तास अभ्यासिका उपक्रम राबविण्यात आले. केवळ भारतीयच नव्हे तर व्हिएतनाम, तैवान व कोरिया देशातील विद्यार्थ्यांनी यावेळी आपली उपस्थिती नोंदवली.

विभागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व काव्यवाचन आणि निबंध स्पर्धा, जागरुकता अभियान आणि अभ्यासक्रमांविषयी मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात आले. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. वासुदेव गाडे तसेच अमेरिकेतील स्कूल ऑफ हेल्थ ॲन्ड ह्यूमन सायन्सेन मधील प्रा. जेरेमी रिंकर या मान्यवरांनी अभियानाला आवर्जून भेट दिली.