शाळा सुरु झाल्या, मुलांना डब्यात काय द्यायचे? बाल आहार तज्ज्ञांनी दिल्या टिप्स 

मुळात लहान मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करत असतात. मोठय़ांच्या आहार पद्धतीचे अनुकरण मुले करत असतात. जर घरातील मोठ्यांनी  चौरस आहार घेतला व मुलांना त्यांच्याबरोबर जेवण दिले, तर मुलांमध्ये हीच सवय लागते.

शाळा सुरु झाल्या, मुलांना डब्यात काय द्यायचे? बाल आहार तज्ज्ञांनी दिल्या टिप्स 
Nutritional Diet For Kids

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उन्हाळी सुट्टीनंतर (Summer Vacation) आता शाळा सुरु झाल्या आहेत. मुलांचा अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या पालकांसमोर असणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांना डब्यात काय द्यावे. असा पदार्थ जो मुलांसाठी पोषक (Nutrition For Kids) ही असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या आवडीचा पदार्थ असावा. लहान मुले असणाऱ्या जवळ जवळ प्रत्येक घरात हा यक्ष प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर पुण्यातील बाल आहार तज्ज्ञ डॉ. नेहा पुंदीर (Dr. Neha Pundir) यांनी 'एज्युवार्ता ' शी बोलताना दिले. (Nutritional Diet)

डॉ.  पुंदीर म्हणाल्या, मुळात लहान मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करत असतात. मोठय़ांच्या आहार पद्धतीचे अनुकरण मुले करत असतात. जर घरातील मोठ्यांनी  चौरस आहार घेतला व मुलांना त्यांच्याबरोबर जेवण दिले, तर मुलांमध्ये हीच सवय लागते. जर मुलांसाठी नेहमीच वेगळे जेवण केले, तर त्यांना फक्त त्याच्या आवडीचे खायची सवय लागेल. म्हणून  मुलांना सर्वाबरोबर जेवू दिले पाहिजे व त्यांच्यासाठी ‘वेगळे’ आवडीचे जेवण करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर जेवताना टीव्ही, पुस्तके, कम्प्युटर बघणे टाळले पाहिजे.

शाळेत गणित अन् विज्ञानाला पर्यायी विषय हवेत का?

लहानपणी आवडीच्या सीरियल, कार्टून्स इत्यादी लावून पालक मुलांना जेवायला घालतात. त्याचे कारण असे की, मुले ते पाहण्यात मग्न झाली की मग काहीही व कितीही प्रमाणात खातात. ही सवय गैर आहे. त्यामुळे मुलांना आपले पोट कधी भरले आणि काय खाल्ले याचे समाधान मिळत नाही. अशा मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढते, असे डॉ.  पुंदीर यांनी सांगितले.

संतुलित आहार हवा.

रोज साधे अन्न खायला मुले कंटाळतात. त्यामुळे त्यांना आठवडय़ातून एक-दोनदा काही तरी ‘खास’ आवडीचा किंवा बाहेरचा आवडीचा फराळ, चॉकलेट आणून देणे गैर नाही. पण हे रोजच्या रोज किंवा जास्त वेळ करणे बरोबर नाही. मुलांमध्ये आहार संतुलित हवा, म्हणजे आहाराचे सर्व घटक योग्य प्रमाणात हवेत. घरी काही कारणांमुळे कोणी काही पथ्य करत असले तरी तसे जेवण मुलांना योग्य नाही. अगदी मुलांमध्ये स्थूलता असली तरीही त्यांना फॅट-फ्री, काबरेहायड्रेट- फ्री असे डाएट देणे टाळावे.

फळे हा उत्तम पर्याय

मुलांना शाळेत डब्यात काय द्यावे या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ.  पुंदीर म्हणाल्या, "पालकांना नेहमी डब्यात काय द्यावे याचा मोठा प्रश्न असतो. बिस्किट, चिप्स, वेफर्स, फराळाचे पदार्थ हे तब्येतीला चांगले नाहीत तर मग डब्यात द्यायचे काय? फळ! फळ खायला सोपे, न्यायला सोपे, पुष्कळशी फळे मुले लहान असताना स्वत: सोलून खाऊ शकतात, जसे केळे. डब्यातून मुलांना फळे दिली पाहिजेत, कारण असे केल्याने जंकफूड खाणे कमी होते.

तुमच्या मुलांना 'गुड टच -बॅड टच' विषयी सांगितलंय का? मग या गोष्टी माहिती हव्यातच...

भाज्या खायला मुले कंटाळा करतात. भाज्या खाण्याची सवय त्यांना हळूहळू लावली पाहिजे. त्याचबरोबर मुलांच्या आवडीच्या पदार्थात वेगवेगळ्या भाज्या घालता येतात. उदा. पराठे वेगवेगळ्या भाज्यांचे करता येतात. कटलेट्समध्ये घालता येतात, पुलावमध्ये पालकाची प्युरी घालून हिरवा पुलाव करता येतो. असे प्रकार रुचकर लागतात व त्यातून भाज्याही खाल्ल्या जातात. मुलांच्या प्रत्येक मील-स्नॅकमध्ये प्रथिने असणे आवश्यक आहे. असे केल्याने त्यांची गरज भागवली जाते. उदा. नाश्त्यात जर पराठा, चपाती इत्यादी दिली तर त्याबरोबर उसळ, दही, पराठय़ात पनीर किंवा डाळीचे फिलिंग करावे. कणकेत बेसन, मुगाची डाळ इत्यादी घालून पराठे, थेपले, थालीपीठ इत्यादी करता येते. मधल्या वेळेच्या खाण्यात तेलबिया जसे शेंगदाणे, बदाम, अक्रोड किंवा चणे इत्यादी देता येते. हे पदार्थ नुसते आवडत नसतील तर त्याचे चिक्की, लाडू इत्यादी असे रुचकर प्रकार करून देता येतात, असेही डॉ.  पुंदीर म्हणाल्या.

तुपाचा एक चमचा पुरेसा

स्निग्ध पदार्थ मुलांच्या आहारात आवश्यक आहेत. कारण त्यातून ऊर्जा मिळते. त्याचबरोब काही आवश्यक फॅट्स जसे ओमेगा ३ फॅटी ऍसिड   सुद्धा स्निग्ध पदार्थांतून मिळत असतात.  ओमेगा ३ फॅटी ऍसिड तल्लख बुद्धी व तीक्ष्ण नजरेकरिता आवश्यक आहे. मांसाहारी मुलांना माश्यांतून हे मिळते, पण शाकाहारी मुलांना अक्रोडमधून हे मिळू शकते. आहारात २-३ तुकडे अक्रोड येता-जाता खायला दिले तर मुलांना फायदा होतो. त्याचप्रमाणे तुपात कमी प्रमाणात का होईना  ओमेगा ३ फॅटी ऍसिड आहे. रोज थोडे तूप मुलांच्या आहारातील उणीव भरून काढते. पण तूप प्रमाणाबाहेर दिले तर स्थूलतेचे प्रमाण वाढते. त्या कारणामुळे दिवसभरात अर्धा-एक चमचा तूप देऊ शकता. असेही त्यांनी सुचविले.

दुधामध्ये चांगल्या प्रतीची प्रथिने असतात व कॅल्शिअम असते. त्यामुळे दूध पौष्टिक आहाराचा घटक आहे. मुलांना  दूध आवडत  नसेल, तर मुलांना  दही देऊ शकता. बऱ्याच मुलांना पनीर खूप आवडते. त्यांना दुधाऐवजी पनीरसुद्धा देता येते. दूध हे  दूध म्हणून पिणे आवश्यक नाही. त्याच्या आवडीप्रमाणे पदार्थ म्हणजे कस्टर्ड, मिल्कशेक इत्यादी करून किंवा लस्सी, फ्रूट-योगर्ट किंवा पनीरचे पदार्थ देता येऊ शकते, असेही त्यांनी सुचवले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2