'नेट'च्या गुणांवर पीएच.डी.प्रवेश ; मग SPPU पेट परीक्षा घेणार का ? विद्यापीठाचा युजीसीकडे पत्रव्यवहार
युजीसीकडे पत्रव्यवहार केला जात असल्याच्या वृत्ताला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दुजोरा दिला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पीएच.डी.प्रवेश (Admission to Ph.D)नेट परीक्षेतील गुणांच्या आधारे देण्याची घोषणा नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission- UGC) केली आहे. परिणामी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) पीएच.डी. प्रवेशासाठी पेट परीक्षा (PET Examination for admission to Ph.D)घेतली जाणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, विद्यापीठातर्फे याबाबत युजीसीकडे पत्रव्यवहार केला जात असून विद्यापीठाला शेवटची पेट परीक्षा घेण्यासाठी परवानगी मिळू शकते. त्यामुळे पुढील आठवड्यात पेट परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेट परीक्षा घेतली जाऊ शकते,असे विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासह राज्य व देशभरातील विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पेट परीक्षेच्या प्रतिक्षेत आहेत.मात्र,नेट परीक्षेतील गुणांच्या आधारे पीएच.डी.देण्याची घोषणा झाल्याने विद्यापीठाची पेट परीक्षा होणार की नाही,अशी चर्चा शिक्षण वतुळात सुरू झाली.विद्यापीठाने सुध्दा पेट परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र,युजीसीच्या घोषणेमुळे विद्यापीठाने सावध भूमिका घेत युजीसीकडे पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून पेट परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली जाणार आहे.दरम्यान, युजीसीकडे पत्रव्यवहार केला जात असल्याच्या वृत्ताला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दुजोरा दिला आहे.
हेही वाचा : आयआयटी बाॅम्बेच्या प्लेसमेंटमध्ये मोठी घट; 36 % विद्यार्थी नोकरीच्या प्रतिक्षेत..
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पीएच.डी.प्रवेशाच्या संख्येत घट झाली आहे. त्यात केवळ नेट परीक्षेच्या आधारे प्रवेश देण्याचा निर्णय झाला तर विद्यार्थ्यांना आणखी काही महिने पीएच.डी. प्रवेशाची वाट पाहावी लागणार आहे.मात्र, युजीसीकडून विद्यापीठाला शेवटची परीक्षा घेण्याची संधी दिली जाईल,असे बोलले जात आहे.