मुंबई विद्यापीठ : १८ दिवसांत निकाल जाहीर, ५८ टक्के विद्यार्थी नापास
मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष बी. कॉम सत्र ५ अभ्यासक्रमाची परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली होती. या परीक्षेसाठी एकूण ५८ हजार ३६७ एवढे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ५५ हजार ६२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र, त्यातील केवळ २३ हजार १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ३२ हजार ४८६ विद्यार्थी नापास झाले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरणारे मुंबई विद्यापीठ (Mumbai University) पुन्हा एकदा परीक्षेच्या एका निकालाने चर्चेत आले आहे. विद्यापीठाने तृतीय वर्ष बी. कॉम सत्र ५ परीक्षेचा (Third Year B. Com Semester 5 Exam) निकाल अवघ्या १८ दिवसांत जाहीर (Results announced in just 18 days) केला आहे. मात्र, या परीक्षेत तब्बल ५८ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याने शिक्षण क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष बी. कॉम सत्र ५ अभ्यासक्रमाची परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली होती. या परीक्षेसाठी एकूण ५८ हजार ३६७ एवढे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ५५ हजार ६२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र, त्यातील केवळ २३ हजार १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ३२ हजार ४८६ विद्यार्थी नापास झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ४१.७५ आहे तर अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ५८.२५ एवढी आहे. यानिमित्ताने विद्यापीठाचा गुणवत्तेचा दर्जा घसरला असल्याचे समोर आले आहे. मात्र, पुढील काळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक घसरण रोखून गुणवत्ता सुधारण्याकडे मुंबई विद्यापीठाच्या संलग्न कॉलेजांना लक्ष द्यावे लागणार आहे.
हिवाळी सत्र २०२४ च्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यंदा सूक्ष्म नियोजन केले आहे. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांचे जलदगतीने मूल्यांकन केले. त्याचा परिणाम म्हणून केवळ १८ दिवसांत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.