MPSC Exams : धोरणात्मक निर्णय घेऊन समस्या त्वरित सोडवणे आवश्यक ; पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवेची पूर्व आणि मुख्य परीक्षा एकच असल्याने त्यांचे कट ऑफ देखील एकच लावण्यात यावे. सर्व परीक्षांची निकाल प्रक्रिया वेगवान करण्यात यावी, या प्रमुख मागण्या एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मांडल्या. 

MPSC Exams : धोरणात्मक निर्णय घेऊन समस्या त्वरित सोडवणे आवश्यक ; पृथ्वीराज चव्हाण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यात स्पर्धा परीक्षेची (Competitive Examination) तयारी करणारे उमेदवार विविध मागण्यांसाठी (Various demands) रस्त्यावर उतरले आहेत.यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली असून योग्यवेळी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून समस्या त्वरित सोडवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. 

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 च्याच पूर्व परीक्षेत कृषी संवर्गच्या राजपत्रित जागांचा समावेश करुन एकत्र परीक्षा घेण्यात यावी. सोबतच सदरील परीक्षेची तारीख लवकर जाहीर करण्यात यावी. सदरील परीक्षा ही शेवटची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारची असल्याने राज्यसेवेच्या सर्व 35 संवर्गातील 1 हजार 500 पेक्षा अधिक जागांचा समावेश 2024 च्या परीक्षेत करण्यात यावा. त्याकरिता राज्य सरकारने सर्व रिक्त पदांचे मागणीपत्र आयोगाकडे तत्काळ पाठवावे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व 2024 परीक्षा घेण्याकरिता 10 दिवसात जाहिरात देण्यात यावी. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवेची पूर्व आणि मुख्य परीक्षा एकच असल्याने त्यांचे कट ऑफ देखील एकच लावण्यात यावे. सर्व परीक्षांची निकाल प्रक्रिया वेगवान करण्यात यावी, या प्रमुख मागण्या एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मांडल्या. 

यावेळी चव्हाण यांनी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत तयारी करताना येणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. तसेच उमेदवारांच्या एका अभ्यासिकेची पाहणी देखील त्यांनी केली. प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता विद्यार्थ्यी पुण्यात येतात. त्यांच्याबद्दल योग्यवेळी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून समस्या त्वरित सोडविणे आवश्यक आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.