एमईएस आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात

प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी कारगिल विजय दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.

एमईएस आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एमईएस आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागाच्या वतीने कारगिल विजय दिन देशभक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. ए. व्ही. हॉल येथे झालेल्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी अधिकारी, कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कारगिल युद्धातील वीर शहीदांना पुष्पांजली अर्पण करून झाली. प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी कारगिल विजय दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.

प्रा. केदार कुलकर्णी यांनी कारगिल युद्धाचा इतिहास, भारतीय सैनिकांचे अद्वितीय शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अजिंक्य देशपांडे, डॉ. बाबासाहेब गव्हाणे, डॉ. किरण दलाल (सीटीओ, आर्मी विंग), श्री. विश्वजित कापटे (सीटीओ, नेव्ही विंग) आणि डॉ. राजेंद्र जामदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात एनसीसी कॅडेट्सनी देशभक्तीपर प्रतिज्ञा घेत कारगिलच्या वीरांना मानवंदना अर्पण केली. देशभक्तीपर गीत, 'वंदे मातरम्' आणि राष्ट्रघोषाने वातावरण भारावून गेले.

यावेळी एनसीसी कॅडेट्सनी तयार केलेल्या कारगिल युद्धावरील पोस्टर्स, मॉडेल्स आणि प्रात्यक्षिकांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कारगिल युद्धातील शौर्यगाथा, भारतीय सैन्याची कार्यपद्धती आणि राष्ट्रसेवेचा संदेश जाणून घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभागाच्या वतीने करण्यात आले असून डॉ. किरण दलाल (सीटीओ, आर्मी विंग) व श्री. विश्वजित कापटे (सीटीओ, नेव्ही विंग) यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.