विकसित भारतासाठी हॅकेथॉन पहिली पायरी : डॉ. शैलेंद्र देवळाणकर
'इनोव्हेशन फाऊंडेशन'च्या राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत पाण्यावर चालणारी दुचाकीची प्रणाली विकसित करणाऱ्या जेएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थांना २ लाखांचे पारितोषिक
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विकसित भारताचे स्वप्न आपल्याला २०४७ पर्यंत पूर्ण करायचे असून त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, अशा प्रमुख योजनांना बळ द्यावे लागणार आहे. तसेच यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यास नाविन्यपूर्ण प्रकल्पांची हॅकेथॉन स्पर्धा ही पहिली पायरी आहे. त्यामुळे आगामी काळात अशा उपक्रमांच्या आयोजनासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग सर्वोतोपरी मदत करायला तयार आहे, असे आश्वासन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले.
विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने 'इनोव्हेशन फाऊंडेशन'च्या वतीने 'इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०' या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचा समारोप रविवारी जल्लोषात झाला. यावेळी पाण्यावर चालणाऱ्या दुचाकीची प्रणाली निर्माण करणाऱ्या हडपसर येथील जेएसपीएम महाविद्यालयाच्या टीम ॲक्वाड्रोव्हने पहिल्या क्रमांकाचे २ लाखांचे पारितोषिक पटकावले. या समारंभात सुमारे ७.५ लाखांपेक्षा अधिक पारितोषिके २५ पेक्षा अधिक संघाना प्रदान करण्यात आली. देशभरातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ३२७ संघांच्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी कृषी, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील विविध सामाजिक समस्यांवर उपाय शोधले. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, वाहनचालक प्रशिक्षण संस्थेचे (आयडीटीआर) प्राचार्य संजय ससाणे, इनोव्हेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, एआयएसएसएमएस आयओआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने, जिल्हा परिषदेचे शिक्षक बालाजी जाधव, डॉ. प्रज्ञा काळे आदी उपस्थित होते. सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच तज्ज्ञ, औद्योगिक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या पॅनलने प्रकल्पांचे परीक्षण केले.
डॉ. देवळाणकर म्हणाले, पुढील २५ वर्षात आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे. आपली अर्थव्यवस्था १० ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायचा आहे. त्यासाठी स्टार्टअप आणि उद्योगांची निर्मिती करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य भारतीयांचे जीवनमान उंचविण्यासाठी, योजना आणि ध्येयधोरणांवर काम करावे लागेल. या दोन पद्धतीने आपल्याला देशाचा विकास साधात विकसित भारताची निर्मिती करावी लागेल. आगामी काळात आपल्याला तंत्रज्ञानाची कास धरून, सामाजिक समस्या सोडवाव्या लागतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आपले नवे उद्योग उभे करावे लागणार आहे. त्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशनद्वारे आयोजित हॅकेथॉन स्पर्धांचा फायदा होणार आहे .त्यातूनच नवउद्योजकांची निर्मिती होणार असून, अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
डॉ. कारभारी काळे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण हे विकसित भारताच्या निर्मितीसाठी उपयोगी पडणार आहे. या शैक्षणिक धोरणाचा विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी फायदा करून घ्यायचा असून, त्यातून नवउद्योजक घडविण्याकडे लक्ष द्यायचे आहे. विद्यापीठे आणि कॉलेजमध्ये इनोव्हेशन सेल; तसेच इंक्युबेशन सेंटर कार्यरत आहेत. त्याचा कायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसा होईल, या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. आगामी काळात आपल्याला रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगारांची निर्मिती करणारे आंत्रप्रेन्युअर्स घडवायचे आहे. त्यासाठी हॅकेथॉन स्पर्धांचा फायदा होणार आहे. आजच्या हॅकेथॉन स्पर्धेत विजेते होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संशोधन करण्याची संधी आली आहे. त्यामुळे समाजाभिमुख नाविन्यपूर्ण संशोधन करून, देशाच्या विकासात हातभार लावावा.
कल्पेश यादव यांनी प्रास्ताविकात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले. डॉ. प्रदीप माने यांनी आभार मानले. इनोव्हेशन फाउंडेशनचे पदाधिकारी तेजस यादव, प्रणव आडकर,नरेंद्र गडदे, निकुंज ओव्हाळ, प्रसन्न चव्हाण, हर्षद पोरे, माधवी शिंदे, सोहम म्हेत्रे, पार्थ बारसे, ऋतुजा काटकर यांनी आयोजनात सहभाग घेतला.
.....
छत्रपती शाहू महाराजांची कौतुकाची थाप
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑल इंडिया श्री शिवाजी महाराज सोसायटीचे अध्यक्ष आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी रविवारी भेट दिली. यावेळी शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांचे प्रकल्प पाहत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली; तसेच नाविन्यपूर्ण संकल्पना आणि प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शाहू महाराज यांनी केले.
...
शिक्षक बालाजी जाधव यांना इनोव्हेशन पुरस्कार प्रदान
डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते 'इनोव्हेशन पुरस्कार' सातारा येथील माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बालाजी जाधव यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी युट्युब चॅनेलच्या माध्यमातून प्राथमिक शाळेचे शिक्षण कसे सोपे होईल, यासाठी काम केले आहे.
....
विजेत्या संघांची थोडक्यात माहिती
....
विजेते: टीम ॲक्वाड्रोव्ह (AquaDrove) (जेएसपीएम कॉलेज, हडपसर)
प्रकल्प : पेट्रोल ऐवजी पाण्यावर चालणारी दुचाकी. ही दुचाकी एकावेळी टाकलेल्या पाण्यातून ५० ते ५५ किमी चालू शकते.
.....
द्वितीय क्रमांक: टीम ॲग्रीवा (Agriva) (वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी, सोलापूर)
प्रकल्प: स्वायत्त कीटकनाशक फवारणी यंत्र (Autonomous Pesticide Spraying Robot - APSR) विकसित करण्यात आले आहे. हे रोबोट शेतीमध्ये स्वयंचलितरित्या कीटकनाशक फवारणी करते, मानवी श्रम कमी करते, अचूक फवारणी सुनिश्चित करते आणि रसायनांचा गैरवापर टाळते.
.....
तृतीय क्रमांक: टीम ड्रीमर (विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि, कोंढवा)
दिव्यांग लोकांसाठी सर्व काही सुविधा एकाच ॲपवर. अशिक्षित लोकांसाठी हे ॲप उपयोगी पडेल.
......
बेस्ट एआय सोल्यूशन: टीम अँम्प्लिफाय (पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय)
प्रकल्प - विद्यार्थ्यांचे गुणपडताळणीसाठी एआयद्वारे मॉडेल उत्तरांचा वापर करून पेपर तपासणी करणारे एआय सॉफ्टवेअर
......
रतन टाटा बेस्ट इनोव्हेशन पुरस्कार: टीम कोड रेड (जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय)
प्रकल्प : ही प्रणाली रुग्णवाहिकांसाठी विकसित करण्यात आलेली एक स्मार्ट सॉफ्टवेअर सोल्यूशन आहे, जी को-पायलटद्वारे नियंत्रित केली जाते. या प्रणालीमध्ये नकाशा तंत्रज्ञान, आयओ टी, आणि रिअल-टाइम वाहतूक नियंत्रणाचा वापर केला जातो, जेणेकरून रुग्णवाहिकांसाठी सर्वात वेगवान आणि सुरक्षित मार्ग निश्चित करता येईल.