नवा आदेश: विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत कौशल्य विकसित करण्यासाठी कृती कार्यक्रम राबवा
विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसीत करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यात यावेत, असे निर्देश पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डाॅ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसीत करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत (Nipun Maharashtra Abhiyan) कृती कार्यक्रम राबवण्यात यावेत, असे निर्देश पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डाॅ. भाऊसाहेब कारेकर (Dr. Bhausaheb Karekar) यांनी दिले आहे.
शाळांनी आपल्या स्तरावरून शिक्षक आणि पालक यांची बैठक घेऊन, शासन निर्णयानुसार मार्गदर्शन व नियोजन करून विहित कालावधीत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, सर्व शाळांतील मुख्याध्यापकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात विद्या समिक्षा केंद्र कार्यान्वित करणेत आलेले असून त्यानुसार इयत्ता १ ली ते १० वी च्या इयत्तेतील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती ऑनलाईन पध्दतीने नोंदवण्यात यावी. शैक्षणिक व भौतिक उपक्रम / योजनांचा राज्य स्तरावरून मागोवा घेणे आणि क्षेत्रिय अधिकारी व शिक्षक यांचे डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी सक्षमीकरण करणे. प्रवेशित विद्यार्थी, शालाबाह्य विद्यार्थी, गळती झालेले विद्यार्थी, मुक्त शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट बालकामगार, दिव्यांग विद्यार्थी, व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण, शिष्यवृत्ती, आर्थिक लाभाच्या योजना, शाळास्तरावरील मूल्यमापन, विद्यार्थी व शिक्षक यांना आवश्यक मदत, प्रोत्साहन व पुरस्कार इ. बाबींवर लक्ष ठेवणे, असे विद्या समीक्षा केंद्राचे उद्दिष्ट आहे.
विद्यार्थ्यांची बौद्धीक पातळी वाढविण्यासाठी व उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकांना मदत करणे. डेटा आधारे तातडीने लक्ष देण्यासाठीची गरजाक्षेत्रे निश्चित करून निर्णय घेण्यासाठी मदत करणे. शिक्षण व्यवस्थेस पूरक ठरणारी सर्व संबंधितास माहिती, जागरुकता आणि मदत करण्यासाठी राज्यस्तरावर मदत कक्ष तयार करणे. सुनिश्चित शाळा मानकांनुसार शाळांची सद्यस्थिती व सुधारात्मक कामगिरीची माहिती दर्शविणारा डॅशबोर्ड विकसित करणे. राज्यातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील समन्वय वाढवून त्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम / योजना / प्रकल्पांचे संनियंत्रण करणे. समग्र शिक्षा, स्टार्स प्रकल्प, पी.एम.श्री. तसेच शासनाचे विविध उपक्रम / योजना /प्रकल्पांचे वार्षिक कार्ययोजना व अंदाज पत्रक तयार करण्यास व शासन स्तरावर धोरण निश्चितीस मदत करणे. शिक्षण व्यवस्थेतील सर्व संस्थांच्या लेखा व वित्त विषयक बार्बीचे डॅशबोर्ड विकसित करून संनियंत्रण करणे, अशी उद्दिष्टे विद्या समीक्षा केंद्राची आहेत.
निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचे ध्येय हे वर्गातील १०० टक्के विद्यार्थ्यांनी १०० टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. परंतु, नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून इयत्ता २ री ते ५ वी च्या प्रत्येक वर्गातील किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे, असे ध्येय या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात येत आहे. हा कृती कार्यक्रम स्वयंअर्थसहायित व विना अनुदानित शाळा व तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता २ री ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहणार आहे. इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरुपात यात सहभागी घेता येणार आहे.