मी मेंढर राखत नव्हतो, मिडियाने TRP साठी स्टोरी चालविल्या; बिरुदेव डोणे
मिडियाने आपला TRP वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्टोरी चालवल्या आहेत. २०२१ पासून मी दिल्ली आणि पुण्यात पुर्णवेळ UPSC ची तयारी करत होतो. वडीलांची तब्येत खराब असल्याने गावाकडे गेलो होतो. त्यामुळे बिरुदेव मेंढर चरायला घेऊन गेला, मेंढर राखत होता यांसारख्या पोस्ट साफ चुकीच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मेंढपाळच्या पोराने (UPSC) युपीएससीला गवसणी घातल्याचे रील्स सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. मात्र, याच युपीएससी पात्र झालेल्या बिरुदेव डोणे (Birudev Done) यांनी मराठी मिडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मिडियाने आपला TRP वाढवण्यासाठी (Social Media TRP) वेगवेगळ्या स्टोरी चालवल्या आहेत. २०२१ पासून मी दिल्ली आणि पुण्यात पुर्णवेळ UPSC ची तयारी करत होतो. वडीलांची तब्येत खराब असल्याने गावाकडे गेलो होतो. त्यामुळे बिरुदेव मेंढर चरायला घेऊन गेला, मेंढर राखत होता यांसारख्या पोस्ट साफ चुकीच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
बिरदेव आधीपासूनच हुशार होता, दहावीत ९६% गुण मिळाले होते तर पुढील शिक्षण नामांकित अशा पुण्यातील COEP कॉलेज मधून घेतलं आहे. UPSC साठी त्याने शहरांत राहूनच तयारी केली आहे. हे नक्कीच बिरदेव डोणे ह्यांच्या प्रामाणिक कष्टाचे फळ आहे, कारण UPSC परीक्षा पास होणं साधी गोष्ट नाही. पण फक्त रील्स बघून नवोदित उमेदवार भरकटण्याची शक्यता आहे, त्यामुळे एखाद्या गोष्टीच्या दोन्ही बाजू तेवढ्याच विचारणे समोर मांडणे गरजेचे आहे.
सात-आठ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी आणि सातत्याने अपयशी ठरणारे हजारो उमेदवार आहेत. स्पर्धा परीक्षा एक चक्रव्यूह आहे, वेळीच बाहेर पडले नाहीत म्हणून काही उमेदवारांनी अक्षरशः आत्महत्या सुद्धा केलेली आहे. रिक्त जागा एक हजार असतील तर अर्ज करणारे दहा लाखाच्या वर असतात, म्हणजे Success Ratio 0.001 इतका कमी आहे. उरलेल्या उमेदवाराच्या हाती काहीच शिल्लक राहत नाही. उमेदवारांनी अशा कथानकांना आणि रील्सला हुरळून न जाता आपले वय, आर्थिक परिस्थिती, प्लॅन B, कौटुंबिक जबाबदारी इ. चा विचार करूनच स्पर्धा परीक्षेत उतरणे आवश्यक आहे.