शाळांना सुट्टी जाहीर; मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळा मुख्यालय न सोडण्याच्या सूचना
18 ऑगस्ट रोजी दुपारचे सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांची राहणार आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचल्याची खात्री झाल्याशिवाय शाळा मुख्यालय सोडू नये, असे आदेश ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी दिले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात मुंबईसह बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागातील शाळांना स्थानिक प्रशासनाने सुट्टी जाहीर (Holiday declared for school)केली आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation)परिसरातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळांना (Pre-primary, primary, secondary, higher secondary, private aided and unaided schools) अतिवृष्टीमुळे 18 व 19 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर (Holiday declared on August 18 and 19) करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे 18 ऑगस्ट रोजी दुपारचे सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांची राहणार आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचल्याची खात्री झाल्याशिवाय शाळा मुख्यालय सोडू नये, असे आदेश ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी दिले आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने 18 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट दिला . त्यातच ठाणे शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 18 व 19 ऑगस्ट रोजी नियोजित असणाऱ्या सर्व परीक्षा व प्रशिक्षणे आदी कार्यक्रम नजीकच्या काळात आपल्या स्तरावर पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
दरम्यान, १९ ऑगस्ट २०२५ रोजी ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे. आपत्ती अधिनियमाच्या तरतुदींच्या अनुषंगाने दि.१९ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व शाळा /महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच शासकीय / निमशासकीय कार्यालयातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त उर्वरीत कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडणेबाबत कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या स्तरावरून निर्णय घेणेबाबत कार्यालयप्रमुखांना निर्देशित करण्यात आले. येत्या दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत आज संध्याकाळपर्यंत पावसाच्या अंदाजानुसार निर्णय घेण्यात येईल,असे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.
