आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाने दिली मुदतवाढ; या तारखेपर्यंत मिळेल प्रवेश
शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 1 मार्च ते 10 मार्चपर्यंत प्रवेश घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

एज्युवार्ता न्यून नेटवर्क
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) राबविल्या जाणाऱ्या 25 टक्के आरक्षित जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेस शिक्षण विभागातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी (RTE admission process)1 मार्च ते 10 मार्चपर्यंत प्रवेश घेण्यास मुदतवाढ (Extension of time to take admission)देण्यात आली आहे. त्यामुळे काही कारणास्तव प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, केवळ 46 हजार 360 विद्यार्थ्यांनीच दिलेल्या मुदतीत प्रवेश घेतले होते. त्यामुळे प्रवेशासाठी मदत वाढ मिळावी, अशी मागणी केली जात होती. त्यावर शिक्षण विभागाने 10 मार्चपर्यंत प्रवेशासाठी मुदत दिली आहे.
राज्याच्या शिक्षण विभागातर्फे 8 हजार 863 शाळांमधील 1 लाख 9 हजार 87 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. राज्यभरातून 3 लाख 5 हजार 152 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील प्रवेशासाठी 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थी पात्र झाले. त्यामधील 46 हजार 360 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळावी म्हणून शिक्षण विभागातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे.