महाविद्यालयांच्या निष्काळजीपणामुळे ५ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली..
काही विद्यार्थी केवळ शिष्यवृत्तीचा आधार घेऊन शिक्षण घेत असतात मात्र, महाविद्यालयांच्या निष्काळजीपणामुळे जर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने समोर येताना दिसत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी (Student Scholarship Application) भरलेल्या महाडीबीटी पोर्टलवरील (MahaDBT Portal) ऑनलाइन अर्जाची पडताळणी (Online Application Verification) महाविद्यालय स्तरावरून करण्यात येते. मात्र, शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही पुणे विभागातील महाविद्यालय, विद्यापीठे आणि संस्था स्तरावर ५ हजार ०२९ अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे महाविद्यालयांच्या निष्काळजीपणामुळे ५ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता उच्चशिक्षण सहसंचालकांनी (Joint Director of Higher Education) या प्रलंबित अर्जाची तत्काळ पडताळणी करण्याचे निर्देश विद्यापीठांचे कुलसचिव आणि महाविद्यालयांच्या प्राचार्य यांना दिले आहेत.
शिष्यवृत्ती नामंजूर झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्ध्यावर सोडण्याची वेळ ओढावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांचा निष्काळजीपणा विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय करताना दिसून येत आहे. ही परिस्थिती सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाची आहे. यापेक्षा भयावह परिस्थिती मुंबई विद्यापीठाची असल्याचे समोर आले आहे. काही विद्यार्थी केवळ शिष्यवृत्तीचा आधार घेऊन शिक्षण घेत असतात मात्र, महाविद्यालयांच्या निष्काळजीपणामुळे जर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने समोर येताना दिसत आहे. शिवाय अशा परिस्थितीमुळे हजारो विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणावर पाणी सोडावे लागते. त्यामुळे त्यांचे भविष्य अंधारमय झाल्याशिवाय राहणार नाही.
महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जावर महाविद्यालयांनी रोजच्या रोज कार्यवाही करणे आणि विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा शिष्यवृत्ती लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयाच्या स्तरावरून पडताळणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय, संस्था आणि विद्यापीठाच्या स्तरावर एकाही विद्यार्थ्यांचे शिष्यवृतीचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच पडताळणी प्रलंबित राहिलेल्या अर्जाबाबत भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या प्रश्नांसंबंधी विद्यापीठाचे कुलसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वस्वी जबाबदार राहतील नमूद करण्यात आले आहे.